Wednesday, April 1, 2015

नामयाचे नेटवर्किंग! - रवि आमले

कोणत्याही संताची दोन चरित्रे असतात- धार्मिक आणि सामाजिक. धार्मिक चरित्रात त्या संताचे काव्य आणि त्याच्या कथा, अध्यात्म आणि चमत्कार हे असते. साहजिकच ते लोकप्रिय असते. जनमानसावर त्याचाच पगडा असतो. पण संतांचे अध्यात्म हे काही आभाळातून पडलेले नसते. म्हणजे, त्याच्या भक्तांना तसे वाटत असले तरी ते तसे नसते. अखेर कोणत्याही धर्माची, धर्मसंकल्पनांची मुळं ही भौतिक परिस्थितीत असतात. संतांच्या अध्यात्माचा उगमही आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीतून होत असतो. या अर्थी त्याचे अध्यात्म हे त्याचे 'पॉलिटिक्स' असते. जसे ते संत ज्ञानदेवांचे होते. नामदेवांचेही होते. नामदेवांचे हे 'पॉलिटिक्स' तर अधिक स्पष्ट आहे; अगदी समर्थ रामदासांच्या इतके! 
यंदाचे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबातल्या घुमान येथे होत आहे. पंजाबी परंपरेनुसार हे नामदेवांच्या समाधीचे गाव आहे. मराठी परंपरा नामदेवांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या महाद्वारी समाधी घेतल्याचे सांगते; आणि ते अधिक इतिहासास धरून आहे. पण येथे प्रश्न श्रद्धेचा असतो. त्यांच्या शीख भक्तांच्या मते, बाबा नामदेवजींनी गुरुदासपूर जिल्ह्यातल्या घुमानमध्ये देहत्याग केला. त्यांच्या स्मरणार्थ तेथे बाबा नामदेवजीका गुरुद्वारा उभारण्यात आला आहे. गावातल्या घराघरांत बाबा नामदेवजींची तसबीर आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला हे माहीत असण्याचे तसे काहीच कारण नाही. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नामदेवांच्या चरित्रातील ही गोष्ट सर्वपरिचित झाली, हे एक बरे झाले. संमेलनाचे बाकी काही नसले, तरी हे एक फलित सांगता येईल. एक मात्र खरे, की नामदेवांचे हे पंजाब नाते तसे महाराष्ट्राला पूर्वीपासूनच माहीत आहे. शिखांचा धर्मग्रंथ गुरुग्रंथसाहिब. त्यात नामदेवांची ६१ पदे आहेत हा तर आपल्या अभिमानाचा विषय असतो; पण तेवढेच. बाकी मग नामदेवांचे सामाजिक चरित्र आपल्याला फार काही ज्ञात नसते. 'नामदेवजी की मुखबानी' म्हणून प्रसिद्ध असलेली पदे 'गुरुग्रंथसाहिब'मध्ये असणे, मुळात त्यांनी िहदी, पंजाबीत तशी पदे करणे ही केवढीतरी मोठी गोष्ट आहे, हेच मुळात आपल्या ध्यानी आलेले नसते. संतांची चरित्रे अनेक चमत्कारांनी भरलेलीच असतात. बालनामदेवाच्या हट्टापायी विठ्ठलाने स्वत: येऊन नवेद्य खाणे, मारवाडातल्या वाळवंटातली विहीर नामदेवांनी पाण्याने भरणे किंवा मेलेली गाय जिवंत करणे, असे चमत्कार नामदेवांच्या चरित्रातही येतात. तशातलाच हा एक चमत्कार अशी एक भावना असते. पण हा चमत्कार नाही. पंजाबीत पदे रचणे ही नामदेवांनी जाणीवपूर्वक केलेली एक कृती आहे. त्यांचे सामाजिक चरित्र पाहिले की ही बाब स्पष्ट होते आणि ते पाहण्यासाठी आधी तो काळ समजून घेतला पाहिजे.
नामदेवांचा जन्म १२७०चा. त्यांच्या नंतर पाच वर्षांनी ज्ञानदेव जन्मले. हे दोघेही समकालीन. दोघेही मराठवाडय़ातले. देवगिरीच्या यादवांच्या राज्यातले. नुकतेच आमणदेव या आपल्या चुलतभावाचे डोळे काढून, त्याला कारावासात टाकून रामदेवराय याने देवगिरीचे राज्य ताब्यात घेतले होते. हा मोठा कर्तापुरुष. दक्षिणेत अधिराज्य स्थापन केल्यावर त्याच्या फौजांनी थेट बनारस जिंकले होते. नामदेव साधारण २२ वर्षांचे होईपर्यंतची ही सगळी धामधूम होती. एकंदर यादवसत्ता तेव्हा वैभवाच्या शिखरावर होती. परंतु हेमाद्रीच्या 'चतुर्वर्गचिंतामणी'ने राज्यात धुमाकूळ घातला होता. या ग्रंथातील ३६५ दिवसांसाठीच्या दोन हजार कर्मकांडांनी सामाजिक जीवनाला वेढून टाकले होते. पुरोहितशाहीचे वर्चस्व अतोनात वाढले होते आणि उत्पादकवर्ग मातीत चालला होता. ज्ञानेश्वरीत 'कुळवाडी रिणे दाटली' असा उल्लेख येतो. वैभवाच्या शिखरावर फक्त सत्ताधारी वर्गच होता. आज ९०० वर्षांनीही त्यात फारसा फरक पडलेला नाही, हे एक विशेष. एकीकडे समाजजीवनाला विळखा घालून बसलेली, वैदिक परंपरेशी पुनरपि नाळ जोडून घेतलेली ब्राह्मणशाही हे तेव्हाचे एक वास्तव होते. त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रात महानुभाव संप्रदाय वाढत होता. बौद्ध धर्म कमकुवत झाला होता, पण जैनमत प्रभावी होते. हे दुसरे वास्तव आणि त्याच वेळी िहदुस्थानात इस्लामी धर्माच्या आक्रमणाखाली येथील राजसत्ता नामशेष होत चालल्या होत्या- हे तिसरे वास्तव. या तिन्ही वास्तवांनी ज्ञानदेवांप्रमाणेच नामदेवांचेही सामाजिक चरित्र आकाराला आले आहे.
यादवांच्या काळात ब्राह्मणी धर्माचे बळ वाढलेले दिसत असले तरी त्यातच सामाजिक ऱ्हासाची चिन्हेही दिसत होती. समाजातील सर्वात मोठा- जो खालचा स्तर तो नाडलेला होता. महानुभाव आणि जैनांहून अत्यंत बलिष्ठ असे सुफी इस्लामचे आव्हान निर्माण झाले होते. यातून निर्माण झालेला सामाजिक विस्कळीतपणा दूर करणे आणि सनातन धर्मावरील आक्रमण परतवून लावणे हा ज्ञानदेवांच्या गीतेवरील टीकेचा हेतू दिसतो. त्यांची ही समाज सांधण्याची आकांक्षा त्यांच्या अद्वैताच्या मांडणीतून स्पष्टच दिसते. ही मांडणी अर्थातच अध्यात्मापुरती मर्यादित राहिली. सामाजिक समतेच्या बाबतीत ज्ञानेश्वरी 'जैसे थे'वादीच राहिली. मात्र स्त्री, शूद्र आणि पापीही अंत:करणपूर्वक भक्ती करील तर तो मोक्षाचा अधिकारी बनू शकतो, ही गीतेची भूमिका मांडून त्यांनी पुरोहितशाहीविरोधात मोठीच क्रांती केली. ज्ञानदेवांच्या या तत्त्वज्ञानाने भागवतधर्माला नवी उभारी दिली. सुतार, लोहार, महार, मांग, कुंभार, चांभार, परीट, न्हावी, भाट, तेली, गुरव आणि कोळी हे १२ बलुत्ये आणि तांबोळी, साळी, माळी, घडशी, तराळ, सोनार, िशपी, गोंधळी, रामोशी, खाटीक, डावऱ्या आणि कळवंत हे १२ अलुत्ये यांच्यातूनच पुढे संत चळवळ फोफावली, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. नामदेव जातीने िशपी होते. जनाबाई दासी होत्या. नरहरी सोनार, सेना न्हावी, गोरा कुंभार, सावता माळी, बंका तसेच चोखा महार होते. हे ज्ञानेश्वरीचे कार्य होते आणि या धर्मचळवळीचे नेते नामदेव होते. पंढरपूर हे तिचे केंद्र होते. ईश्वराच्या कल्पनेचे लोकशाहीकरण ही चळवळीची भूमिका होती.
यानंतर नामदेवांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना येते- ती तीर्थाटनाची. ज्ञानेश्वरांच्या आग्रहाखातर त्यांनी काही संतमंडळींसमवेत तीर्थाटन केले. ज्ञानेश्वर-नामदेवांबरोबर त्या यात्रेत अन्य कोण होते याचा उल्लेख नाही. पण तेथून आल्यानंतर पंढरपुरात जी जेवणावळ झाली तिला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, सावता माळी, नरहरी सोनार, चोखामेळा, बंका महार, गोरा कुंभार ही मंडळी असल्याचे 'तीर्थावली'तून दिसते. हे नामदेवांनी उभारलेले जाळे होते. महाराष्ट्र, गुजरातमधील तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यानंतर ते उत्तरकडे गोकूळ, वृंदावन, मथुरा, काशी, प्रयाग असे करत पंजाबात गेले. हे साधे तीर्थाटन नव्हते. त्या त्या भागातील धार्मिक चळवळींना दिशा देणारी अशी ही मार्गदर्शन यात्रा होती. ती भक्तिसंप्रदायाची प्रचार मोहीम होती आणि इस्लामच्या धार्मिक आक्रमणाविरोधातील एल्गारही होता, हेही ध्यानी घेतले पाहिजे.
अल्लाउद्दीन खिलजी या तुर्काने १२९६ मध्ये देवगिरीचा पाडाव केला, पण त्याआधी अनेक वर्षे इस्लामचा धोका स्पष्ट दिसत होता. तेराव्या शतकाच्या प्रारंभी शहाबुद्दीन घोरीच्या दुसऱ्या आक्रमणाच्या वेळी त्याच्यासोबत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे सुफी संत दिल्लीला आले होते. तेथून त्यांनी अजमेर हे आपले केंद्र बनविले. भारतातील इस्लामच्या प्रचाराचे मोठे श्रेय त्यांना जाते.
दक्षिणेपुरतेच बोलायचे झाल्यास याच कालखंडात सुफी समरस्त हा सुफी संत गुलबर्गा जिल्ह्यात शहापूरला स्थायिक झाला होता. त्याने तेथील राजास ठार मारून जम बसवला होता. वऱ्हाडात मंगळूरपीर येथे हयात कलंदर हा सुफी संत वास करून होता. त्याने तेथील राजाला मारून अनेकांना इस्लामची दीक्षा दिली होती. इस्लामचा प्रभाव एवढा वाढत चालला की पुढे गुरुदेव दत्ताने फकिराच्या वेशात भक्तांना दर्शन दिले, या कथेत कोणाला काही वावगे वाटेनासे झाले. नामदेवांच्या चळवळीपुढे हे सुफींचे मोठे आव्हान होते. उत्तर हिंदुस्तानात तर ते अधिक कठीण होते.
ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर नामदेव पुन्हा िहदुस्थान यात्रा करण्यास जातात हे येथे लक्षणीय आहे. ते दक्षिणेत गेले. गुजरात, सौराष्ट्र, सिंध, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल या भागांत बराच काळ राहिले. तेथील भाषा शिकले. त्यांचे साहित्य आणि व्यक्तित्व यांचा त्या त्या प्रदेशांतील लोकांवर पडलेला प्रभाव अजूनही दिसतो. दक्षिणेतील दर्जी ही जात स्वत:ला नामदेव म्हणवून घेते. भूसागर आणि मल्ला या जातींनी नामदेव हे पर्यायी नाव घेतले आहे. राजस्थानातील छिपा दर्जी स्वत:स नामावंशी छिपा दर्जी असे म्हणू लागले आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे नामदेवांची मंदिरे आहेत. त्या काळातील व नंतरच्या रोहिदास, धना, तुलसीदास, कबीर, मीराबाई, नरसी मेहता या संतांच्या वाङ्मयातून त्यांचा नामोल्लेख येतो. पंजाबात तर ते अठरा वष्रे राहिले. १३५० साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १०९ वर्षांनी नानक येतात. आणि तब्बल २३१ वर्षांनी- १५८१ मध्ये शिखांचे पाचवे गुरू अर्जुनसिंह यांच्या काळात ग्रंथसाहेबची निर्मिती सुरू होते. या ग्रंथात नामदेवांची ६१ पदे येतात, यावरूनच त्यांच्या स्मृती किती गडद होत्या हे लक्षात यावे.
आता समाजमनात कुणाचा आठव असा जागृत असणे याचा अर्थ सामाजिक कृतज्ञतेमध्येच शोधावा लागतो. बाबा नामदेवजींबाबत शीख समाजात जी भक्ती आहे ती त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे. ती प्रेरणा वारकरी संप्रदायाची होती, आध्यात्मिक समतेची होती आणि सामाजिक आत्मविश्वासाची होती. नामदेवांच्या मुखबानीतील काही पदे यासंदर्भात पाहण्यासारखी आहेत. 'मैं अंधुले की टेक तेरा नाम खुन्दकारा' (संसारात अंध झालेल्या माझ्यासारख्या दीन माणसाला हरिनाम हाच एक आधार आहे.) हा विचार कर्मकांडांचे जोखड झुगारून देण्याचा होता. 'हिंदू पुजे देहुरा, मुसलमान मसीत, नामा सोई सेविया, जहाँ देहुरा ना मसीत' (हिंदू देवळात, मुसलमान मशिदीत पूजा करतात. परंतु मी जिकडे ना देऊळ आहे ना मशीद अशा ठिकाणी पूजा करतो.) हा विचार िहदू आणि मुसलमान यांच्या देवस्थानांना आव्हान देणारा होता. नामदेवांच्या चरित्रकथांपैकी एक कथा अशी की, मुसलमान होण्यासाठी सुलातानाने त्यांना विवश केले असते. त्यांची आई घाबरते. 'रुदन करै नामेकी माई, छोडी राम कीन भजन खुदाई' अशी तिची स्थिती. तेव्हा नामदेव म्हणतात, 'न होऊ तोर पूंगडा न तू मेरी माई,पिंडु पडै तऊ हरिगुन गाई.' समाजातील वरिष्ठ वर्ग जेव्हा मुस्लीम सत्तेच्या पायाशी जाऊन बसलेला होता तेव्हा शूद्रातिशूद्र वर्गाला आत्माभिमान देण्याचे हे काम होते. मध्ययुगीन कालखंडात जेव्हा सगळ्याच प्रेरणा धार्मिक असतात तेव्हा सगळ्या लढायाही धार्मिकच असतात. नामदेवांची लढाई एकाच वेळी 'चतुर्वर्गचिंतामण्योक्त' ब्राह्मणी धर्म आणि आक्रमक इस्लाम यांच्या विरोधातील होती. नामदेवांनी त्यासाठीची भुई तयार केली. त्याकरिता चळवळ उभारली. पंजाबातही नामदेवांना बहोरदास, लध्धा, विष्णुस्वामी, केशव कलधारी, जाल्लो तथा जाल्हण सुतार असा शिष्यगण मिळतो, ही गोष्ट येथे महत्त्वाची आहे.
नामदेवांच्या या सगळ्या कार्याच्या मुळाशी त्यांचे माणसांशी संवाद साधणे, जगी ज्ञानदीप लावणे हे होते. परप्रांतात जाऊन त्यांनी तेथील भाषा आत्मसात केली. तीही इतकी की त्यात साहित्य प्रसवण्याएवढी! नामदेवांच्या नावावर सुमारे सव्वाशे हिंदी पदे आहेत. तेथे जाऊन त्यांनी त्या लोकांमध्ये धर्मजागृती केली. त्यांचे जगणे किमान सोपे केले आणि ते शब्दांच्या माध्यमांतून केले. हे पाहिले की मग त्या शब्दांना वजन किती असेल ते लक्षात येईल. शिवाय हे सर्व त्यांनी तेराव्या-चौदाव्या शतकात केले आहे. त्याआधी महाराष्ट्रातील राजे बनारसपर्यंत जाऊन आलेले आहेत. पठण हे क्षेत्र तेव्हाही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध होते. माणसांचे जाणे-येणे आणि विचारांचे आदानप्रदान होत होते. नामदेवांचे वैशिष्टय़ हे, की त्यांनी जाईल तेथे माणसांचे नेटवर्क उभारले, लोकांस चळवळीस लावले. असे करणारा मराठी मातीतील हा पहिलाच पुरुष म्हणावा लागेल. त्यांच्यानंतरचा असा महामानव महाराष्ट्रात जन्माला येण्यास मग थेटच १६३० हे साल उजाडावे लागले. त्यानंतर मग टिळक, आंबेडकर, सावरकर, विनोबा अशी एक फळी येते. पुढे मात्र सारे शांत.
स्वातंत्र्योत्तर काळात या भूमीने संपूर्ण देशाला काही विचार देण्याचे, विचारांवर प्रभाव पाडण्याचे काम जवळजवळ बंदच केले असे म्हणावे लागेल. म्हणजे, 'महाराष्ट्र मेला तर राष्ट्रगाडा चालणार नाही,' हा एल्गाराचा उद्गार नसून जणू या भूमीला मिळालेले सदासर्वकाळचे वरदान आहे असे आपण समजत राहिलो आणि झोपी गेलो असेच हे प्रकरण होते. एखादे शरद जोशी त्यांचा 'इंडिया विरुद्ध भारत' हा विचार घेऊन देशभरातील शेतकरी चळवळीला तत्त्वज्ञान देतात. एखादे खांडेकर, तेंडुलकर, सारंग वा नेमाडे देशातील साहित्य चळवळींना दिशा देतात. कोलटकर- चित्र्यांसारखे कवी आणि किरण नगरकरांसारखे कथा-कादंबरीकार मराठीसह इंग्रजीतही नवनिर्मिती करतात. 'नामदेवजी की मुखबानी' पंजाबीत आहे. पण तिचे नुसते असणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. आजकालचे मराठीतले काही खपाऊ साहित्यिकांच्या खपाऊ कादंबऱ्यांचेही अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. पण हा निरा भाषेचा प्रश्न नसतो; तो भाषिक कृतीच्या प्रभावाचा मुद्दा असतो. तेरावे शतक आणि आजचा काळ यांतील दळणवळणाच्या, संपर्काच्या साधनांत किती फरक आहे. आज घरात बसून मत्रविनंत्या पाठवून माणसे जोडता येणे शक्य आहे. त्यासाठी इंटरनेट आहे. आणि तरीही नामयासारखे नेटवर्क साधणे जमण्यापलीकडे गेले आहे. याचे कारण नामदेव हे महामानवच होते, असे म्हणून चालत नसते. याचे कारण आपल्या प्रेरणा आणि बांधीलकींमध्ये, आपल्या 'पॉलटिक्स'मध्ये शोधायचे असते.

- लोकसत्ता (लोकरंग, लेख)
दि. २९/०३/२०१५, रविवार

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...