Thursday, February 26, 2015

२६ फेब्रुवारी, १९६६: स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या समर्पित जीवनाची अखेर

२७ फेब्रुवारी १९६६ चे सगळे पेपर सावरकर गेल्याची दुःखद बातमी घेऊन आले. ' महाराष्ट्र टाइम्स ' मधेही ही बातमी पहिल्या पानावरची पहिली हेडलाइन होती. टाइम्स अर्काईव्ह्जच्या मदतीने ही बातमी आम्ही ऑनलाइन वाचकांसाठी देत आहोत.
.............................................

स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या समर्पित जीवनाची अखेर
 
चार आठवडे मृत्यूशी प्रखर झुंज
अंत्यदर्शनासाठी हजारो लोकांची रीघ : आज दुपारी चंदनवाडीत अंत्यसंस्कार

(आमच्या प्रतिनिधीकडून) 

मुंबई, शनिवार - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गेला महिनाभर मृत्यूशी चाललेली प्रखर झुंज आज सकाळी ११.१० वाजता संपली व त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधानाचे वृत्त समजताच सारा भारत हळहळला आणि सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत सा-यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर योद्ध्याला, मराठी सारस्वताला अमर साहित्याचे लेणे देणा-या महाकवीला आणि बुद्धिप्रामाण्याचा आग्रह धरणा-या कर्त्या सुधारक तत्वज्ञाला श्रद्धांजली अर्पण केली.

वीर सावरकरांची प्रकृती गेला महिनाभर चिताजनक होती, पण गेले चार दिवस ते मृत्यूशी अक्षरश: तीव्र लढत देत होते. आज त्यांच्या डॉक्टरांनी काढलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, १०.३० वाजता त्यांचे श्वसन व रुधिराभिसरण एकदम मंदावले, ताबडतोब कृत्रिम उपयांनी श्वसन व रुधिराभिसरण सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आलं, त्यांच्या प्रकृतीत तात्पुरती सुधारणा झाली. परंतु थोड्याच वेळात त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली व शेवटी मृत्यूने सर्व मानवी प्रयत्न हरवले व वीर सावकरांची प्राणज्योत विझली.

वीर सावरकरांचे चिरंजीव विश्वासराव, कन्या प्रभावती चिपळूणकर, जावई माधवराव चिपळूणकर, पुतणे विक्रम व अशोक इत्यादी नातेवाईक मंडळी व डॉ. सुभाष पुरंदरे, डॉ. अरविंद गोडबोले, डॉ. वसंत काळे प्रभृति त्यांचे वैद्यकीय साहाय्यक निधन समयी त्यांच्या जवळ होते.

वीर सावरकरांच्या निधनाचे वृत्त मुंबई शहरात वायुवेगाने पसरले व दादरच्या शिवाजी पार्कजवळील सावकर सदनापाशी हजारो नागरिकांची अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली. ही गर्दी क्षणाक्षणाला वाढत होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सावरकर सदनापासून सुरू झालेली रांग शिवाजी पार्कजवळच्या रस्त्यावरून वळून कोहिनूर मिलजवळून गोखले रस्त्याच्या बाजूला गेली. दुपारी चार वाजता मुंबईचे महापौर माधवन यांनी सावरकरांच्या पार्थिव देहाला पहिला पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर अक्षरश: हजारो पुष्पहार अर्पण करण्यात आलं.

सावरकर सदनात तळ मजल्यावरील दर्शनी खोलीत सावरकरांचा पार्थिव देह उच्चस्थानी ठेवण्यात आला होता. हिंदुमहासभेच्या कृपाण कुंडलिनी व स्वस्तिक चिन्हांकित ध्वजाने तो आच्छादला होता व त्यावर पुष्पहार घालण्यात आला होता. खोलीत तीनही सावरकरबंधूंची व सौ. माई सावरकर यांचे अशी तीन छायाचित्रे ठेवली होती व चार समया तेवत ठेवल्या होत्या. सदनावरील हिंदू ध्वजही अर्धा फडकत होता. गीता व वेदमंत्राचे पठण सुरू होते व आबालवृद्ध स्त्री-पुरुष नागरिक मृत्यूजय सावरकरांच्या अंत्यदर्शनासाठी येत होती. कोणी पुष्पहार आणले होते तर कोणी नुसतीच सुवासिक फुले वाहात होते आणि बहुसंख्य नागरिक मुक्या मनाने आणि साश्रु नयनांनी केवळ नमन करून जात होते.

महापौरांच्या पाठोपाठ दर्शनासाठी आलेल्या नागरिकात केशवराव दाते, नानासाहेब फाटक यांच्यासारखे नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध कलावंत जसे होते त्याचप्रमाणे वसंत देसाई, सुधीर फडके इत्यादी संगीतज्ज्ञही होते. आणि राजकीय क्षेत्रातील नेते तर होतेच होते. कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष कॉ. श्री. अ. डांगे, जनसंघाचे अध्यक्ष बच्छराज व्यास, स्वतंत्र पक्षाचे नेते कन्हय्यालाल मुन्शी, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष सरदार प्रतापसिंग यांनी वीर सावरकरांच्या पार्थिव देहास आपापल्या पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण केले. त्याशिवाय डॉ. मटकर, डॉ. त्र्यं. रा. नरवणे, शेरीफ श्री. गंगाराम जोशी, प्रा. अनंत काणेकर, श्री. शं. नवरे, रा. म. आठवले, ना. वि. मोडक, ठाण्याच्या नगराध्यक्ष सौ. सुमन हेगडे, राष्ट्रसेविका समितीच्या श्रीमती लक्ष्मीबाई केळकर इत्यादी अनेक मंडळी अंत्यदर्शनासाठी येऊन गेली. संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अंत्यदर्शनाची रीघ थांबली नव्हती. रविवारी सकाळी आठपासून दुपारी दोनपर्यंत पुन्हा दर्शन मिळू शकेल असे जेव्हा जमलेल्या लोकांना सांगितलं तेव्हाच मध्यरात्रीनंतर गर्दी कमी होऊ शकली.

हिंदू महासभेचे अध्यक्ष नित्यनारायण बानर्जी, इंडियन नॅशनल चर्चचे फादर विल्यमस, नभोवाणी व माहिती खात्याचे मंत्री राजबहादूर तसंच के. एम. मुन्शी यांनी सावकर सदनात जाऊन स्वातंत्र्यवीरांचे अखेरचे दर्शन घेतले.

परगांवचे लोक आले

वीर सावरकरांच्या निधनाचे वृत्त सायदैनिकांचे खास अंक, आकाशवाणीवरील वृत्त-सायंदैनिकांचे खास अंक, आकाशवाणीवरील वृत्त-निवेदन यामुळे घरोघर व गावोगाव पोहोचण्यात वेळ लागला नाही. मुंबईत संध्याकाळचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आलं. तर अनेक सार्वजनिक संस्था, मंडळे यांनी त्यांच्या पुष्पहारमंडित प्रतिमा लावून आपली श्रद्धांजली अर्पण केली. आज दर्शनासाठी व वसई-कर्जत इथपासून उपनगरातील नागरिकांच्या जोडीने दुपारच्या गाडीने आलेले अनेक पुणेकर नागरिकही होते.

शेवटला आजार

१९५२ साली वीर सावरकरांनी अभिनव भारत या क्रांती संस्थेचे समारंभपूर्वक विसर्जन केलं आणि त्यानंतर राजकीयदृष्ट्या ते निवृत्त जीवनच जगत होते. तरीही त्यांचे लेखन, वाचन, भेटीगाठी हे सुरूच असे. १९६१ साली पुण्याला मृत्यूजय-दिन साजर झाला त्या वेळी त्यांनी जाहीर सभेत शेवटचे भाषण केलं. १९६३ साली त्यांचा ८१ वा वाढदिवस समारंभपूर्वक साजरा झाला. पण त्या वेळी त्यांनी सभा-भाषणच काय दर्शन देणंही कटाक्षाने टाळले. त्याच दिवशी अपघात होऊन ते पडले व त्यांच्या मांडीचे हाड मोडले. या अपघातातून सावरकर बचावले पण ते शय्येवर खिळूनच राहिले. मधूनमधून त्यांची प्रकृती चिंताजनक बने पण पुन्हा सुधारणा होई. गेला महिनाभर मात्र वीर सावरकरांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. गेला आठवडा ती चिंताजनक होती आणि आज सकाळी ते अत्यवस्थ झाले व अखेर मृत्यूने त्यांना गाठले.

अखेरपर्यंत वाचन व चिंतन

या सर्व आजाराच्या काळात सावकरांचे वाचन-चिंतन सुरूच होते. रोजची वृत्तपत्रे ते नियमितपणे वाचत, गेल्या आठवड्यात रँग्लर परांजपे यांच्या ९१ व्या वाढदिवसाचे वृत्त त्यांनी वाचले आणि आपल्या एकेकाळच्या गुरूंना त्यांनी शुभेच्छादर्शक तार पाठवली.

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...