Saturday, January 31, 2015

एअरफोर्स वन - सारंग थत्ते (निवृत्त कर्नल)

आजपर्यंत कधीच न झालेली गोष्ट यंदा होते आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट देण्याचे प्रसंग तसे बर्‍याचदा आले. पण आजपर्यंत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षानं भारतीय प्रजासत्ताकदिन किंवा स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाला उपस्थिती लावली नव्हती. यंदा प्रथमच तसं होतंय. भारताच्या खास आमंत्रणावरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा खास पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र जगभरात अलीकडेच घडलेल्या अनेक दहशतवादी कारवाया आणि अतिरेक्यांनी दिलेल्या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ते कितपत सुरक्षित आहेत याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता आहे. विशेषत: ज्या विमानानं ओबामा भारतात येणार आहेत, त्या विमानाचं असं काय वैशिष्ट्य आहे? वॉशिंग्टन ते नवी दिल्लीपर्यंतचा प्रवास ओबामा त्यांच्या खास विमानातून करतील जे बोईंग कंपनीने तयार केले आहे. हवाई संदेशाच्या भाषेत या विमानाचे नाव आहे ‘एअर फोर्स वन’. खरं तर ते उडतं ‘व्हाईट हाऊस’च आहे. त्याची वैशिष्ट्यं पाहिल्यावर आपल्याला कळेल, त्याला जगातील सर्वात सुरक्षित विमान का म्हटलं जातं?
 
सहा मजल्यांच्या उंचीचे
तीन मजली विमान
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकरिता बोईंग कंपनीने ७४७-२०० बी या मॉडेलची दोन विमाने तयार केली आहेत. विमानांना त्यांच्या शेपटावर लिहिलेल्या क्रमांकामुळे ओळखले जाते. त्यानुसार एकावर नंबर आहे २८००० आणि दुसर्‍यावर २९०००. बर्‍याचदा ही दोन्ही विमाने राष्ट्रपतींच्या बरोबरच असतात. ‘एअरफोर्स वन’मध्ये सुमारे ४००० चौरस फूट जागा आहे.  पंचतारांकित हॉटेलपेक्षाही हे हवाई कार्यालय उच्च दर्जाचे आहे. काम आणि आरामासाठी येथे ऐसपैस जागा आहे. राष्ट्रपतींकरिता वेगळ्या खोल्या, ग्रंथालय, व्यक्तिगत कार्यालय, शयनगृह, स्नानगृह अशा अनेक गोष्टी येथे आहेत. सर्वात वरच्या मजल्यावर चालक दल आणि दळणवळणाची संचार साधने आहेत. मधल्या मजल्यावर बाकी सर्व व्यवस्था आणि सर्वात खाली सामान ठेवण्याची व्यवस्था आहे. विमानाची उंची एका सहा मजली इमारतीइतकी म्हणजे ६३ फूट आहे.
 
२००० माणसांचा ‘तयार’ स्वयंपाक!
राष्ट्रपती जेव्हा परदेश दौर्‍यावर जातात तेव्हा निवडक सहकार्‍यांना त्यांच्याबरोबर ‘एअर फोर्स वन’मध्ये जाण्यासाठी निवडले जाते. विमानात एक मोठा संमेलन कक्ष आहे. गरज पडल्यास त्यालाच भोजन कक्ष बनवले जाते. इथल्या स्वयंपाकघरात एकावेळी १०० लोकांचे जेवण बनवण्याची सोय आहे, मात्र विमानाच्या कोठारात २००० लोकांचे खाणे फ्रीजरमध्ये ठेवलेले असते. गरजेच्या वेळी ते गरम करायचं की झालं! दौर्‍याबरोबर जाणार्‍या वर्तमानपत्राचे वार्ताहर, अन्य माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. विमानामधून फॅक्स, ई-मेल वगैरेसाठी सॅटेलाइटद्वारे संपर्क साधला जातो; शिवाय मनोरंजन किंवा इतर कामांसाठी टेलिव्हिजनवर हवा तो कार्यक्रम पाहण्याची सोय!
 
स्वयंचलित लोडर
सुरक्षेच्या कारणास्तव ‘एअरफोर्स वन’ची बरीचशी माहिती गोपनीय ठेवली जाते. विमानात एक डॉक्टरची सेवा सर्वकाल उपलब्ध असते आणि आवश्यक तपासण्या आणि अत्याधुनिक उपचारांची सोय तेथे असते. राष्ट्रपतींच्या रक्तगटाशी मिळत्या रक्ताच्या बाटल्या विमानात उपलब्ध असतात. विमानाच्या एका कक्षात फोल्डिंग स्वरूपात शस्त्रक्रिया टेबलही उपलब्ध असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची औषधे आणि औषधालयाचीही सोय येथे आहे. ‘एअरफोर्स वन’ प्रकृती व स्वास्थ्याच्या बाबतीत अतिशय जागरूक आहे. विमानाच्या खालच्या मजल्यावर सामान चढवायला स्वयंचलित लोडरची व्यवस्था आहे. ज्यामुळे कोणत्याही विमानतळावर ‘एअरफोर्स वन’ला त्या विमानतळाच्या सामान चढवायच्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत नाही. यामुळे सुरक्षेला असणारा धोका बर्‍याच प्रमाणावर टाळला जातो.

३६००० फुटांवरही सुरक्षित
या विमानाची दळणवळण यंत्रणा सवरेत्तम आहे. अगदी उडत्या विमानातूनही जगातील कोणत्याही कोपर्‍यात कोणत्याही अडथळ्यांशिवाय संवाद होऊ शकतो आणि हा संवाद पूर्णपणे सुरक्षित असतो. कोणीही या गोष्टी टॅप करून ऐकू शकत नाही. फॅक्स, रेडिओ, टेलिव्हिजन आणि कार्यालयीन अन्य उपकरणे ज्या पद्धतीने जमिनीवर उपयोगात येतात त्याच पद्धतीने इथेसुद्धा केली जातात. ३६,००० फूट उंचीवरून चाललेल्या या विमानात कार्यालयीन सर्व काम सहजपणे तर होतंच, पण तरीही अत्यंत सुरक्षित. अणुस्फोटापासूनही हे विमान सुरक्षित राहू शकते. खरे तर इलेक्ट्रॉनिक्सची साधने अवकाशात विकिरण प्रभावामुळे विमान चालवण्यात अडथळा आणू शकतात, पण ‘एअरफोर्स वन’वर असलेली सर्व उपकरणे अशा प्रकारे बनवलेली आहेत की त्यावर असलेल्या सुरक्षा कवचामुळे विमानावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. विमानावर शत्रूनं मिसाइल हल्ला केला, तरीही उष्ण गोळे फेकून मिसाइलच्या मार्गात बदल करता येऊ शकतो आणि ‘एअरफोर्स वन’ला वाचवता येऊ शकतं.
 
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याचीही सोय!
विमानावरील सर्व कर्मचार्‍यांची कठोर चौकशी केल्यानंतरच त्यांना या विमानात काम करण्याची परवानगी दिली जाते. बहुतेक कर्मचारी सशस्त्र सेनेमधून आलेले असतात. विमानात कोणत्याही प्रकारे विषबाधा वगैरे घटना होऊ नये म्हणून स्वयंपाकी आणि स्वयंपाकाचे सामान खरेदीसुद्धा गुप्तपणे केली जाते. राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणजे गुप्तहेर संघटनेचे एजंट आपल्या शस्त्रासकट सुरक्षेसाठी २४ तास दक्ष असतात. नोव्हेंबर १९६३ मध्ये राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या हत्त्येनंतर लिंडन जोन्सन यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ ‘एअरफोर्स वन’वर दिली गेली होती. १९४३ मध्ये फ्रान्क्लीन रुझवेल्ट अमेरिकेचे प्रथम हंगामी राष्ट्राध्यक्ष होते. ज्यांनी कासाब्लांका येथे अमेरिकेबाहेर दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी बैठक बोलावण्यासाठी बोईंग ३१४ विमानाचा उपयोग केला होता. सुरुवातीला बी-२४ बॉम्बरमध्ये फेरफार करून राष्ट्राध्यक्षांकरिता उपयोगात आणले गेले होते. तेव्हा याचे नामकरण ‘गेस व्हेअर टू’ असे केले होते. त्यानंतर इतक्या वर्षांत जसेजसे राष्ट्रपती बदलत गेले आणि उद्योगात बदल घडून आले तसेतसे उड्डाणाकरिता नवीन नवीन विमाने बनवली गेली. आता उपयोगात असलेली विमाने २०१७ मध्ये परत बदलली जातील.
 
उडतं  ‘व्हाईट हाऊस’
लांबी - २३१ फूट १० इंच
उंची - ६३ फूट ५ इंच
पंखांची रुंदी - १९५ फूट ८ इंच
इंजिन - चार जनरल इलेक्ट्रिक 
सीएफ- ६/८०सी२बी१जेट इंजिन
थट्र - ५६७०० पॉण्ड 
प्रत्येक इंजिन
जास्तीत जास्त वेग - ६३० से ७०० मैल प्रतितास
उड्डाणी उंची- ४५,१०० फूट
इंधन - ५३६११ गॅलन
पृथ्वीची अर्धी फेरी पूर्ण इंधनासकट
वजन - ८३३००० पौंड
एकूण प्रवासी समता -
७० (चालक/कर्मचारी दल २६)
टेलिफोन - ८५
टेलिव्हिजन - १९
विजेच्या तारा - २३८ मैल
 
- मंथन, लोकमत 
दि. ३१/०१/२०१५, शनिवार

Tuesday, January 20, 2015

शिडात भरली हवा! - विनायक परब

भारतीय संरक्षण दलांची नौका वादळवाऱ्याला तोंड देत हेलकावे खात होती. गेल्या ३० वर्षांत जग खूप बदलले. मात्र भारतीय संरक्षण दलांच्या भात्यात मात्र फारशी भर पडली नव्हती. निमित्त झाले ते बोफोर्स तोफांमधील गैरव्यवहाराचे आणि मग संरक्षण दलांच्या माथी केवळ उपेक्षाच आली. संरक्षण सामग्रीचा करार म्हणजे कोटय़वधींचा गैरव्यवहार असा एक समजच समाजामध्ये पसरला. मग कधी आधीच अनेक टेकूंवर उभ्या राहिलेल्या केंद्र सरकारसमोर नवीन समस्या नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर कधी अशा करारांवरून विरोधी पक्षांकडून होणाऱ्या संभाव्य टीकेला घाबरून हे व्यवहार टाळण्यात आले; पण वास्तव अतिशय भेदक होत चालले होते, ते टळणारे नव्हते. अखेरीस जनरल व्ही. के. सिंग लष्करप्रमुख पदावरून पायउतार होताच बोलून गेले की, युद्ध झाले तर भारतीय सैन्याची अवस्था फार वाईट असेल. त्यांची उमेद बुलंद आहे; पण त्याला शत्रूवर तुटून पडण्यासाठी सामथ्र्य देईल अशी शस्त्रसामग्री मात्र भारताकडे नाही. लष्करप्रमुखाने दिलेला तो घरचा आहेर होता. भारतीय सैन्याचे मनोबल जबरदस्त आहे याविषयी कोणताही संदेह नाही; पण केवळ मनोबलाच्या आधारे आधुनिक शस्त्राशिवाय शत्रूशी दोन हात करणे अवघड आहे आणि दुसरीकडे सरकारचे संरक्षण दलांकडे केवळ आणि केवळ दुर्लक्षच सुरू आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली होती. मात्र ती टीका त्या वेळेस फारशी कुणी गांभीर्याने घेतली नाही, कारण त्याला जनरल व्ही. के. सिंग यांच्या निवृत्तीवरून उठलेल्या वादळाची पाश्र्वभूमी होती. त्यामुळे त्या आकसातून त्यांनी सरकारला धारेवर धरले असावे, असा गैरसमज समाजमनात रूढ झाला होता; पण खरे तर ती वस्तुस्थितीच होती. 
बोफोर्सनंतर एक एक करत अनेक गैरव्यवहार उघडकीस आले. त्या त्या वेळेस त्याच्याशी संबंधित गैरव्यवहारांचे आकडे वाढतही गेले. राष्ट्रकुल, टूजी गैरव्यवहार यांच्याशी तुलना केली, तर बोफोर्स हा फारच छोटेखानी गैरव्यवहार होता, असेच मानावे लागेल. मात्र बोफोर्सचा परिणाम जबरदस्त होता. काँग्रेसला पहिल्यांदाच सत्ता गमवावी लागली. एवढेच नव्हे तर दीर्घकाळ सत्तेपासून दूर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. राजीव गांधींवर झालेल्या आरोपांचा काळिमा आजही बहुतांश कायम आहे. त्याचा परिणाम भारतीय जनमानसावर खूपच मोठा होता.
मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात तर पहिली पाच वर्षे बरी म्हणावी अशी अवस्था नंतर आली. त्यात सर्वाधिक काळ संरक्षणमंत्री राहिलेल्या ए. के. अँटोनी यांनी तर संरक्षण दलांच्या खरेदीच्या संदर्भातील व्यवहार टाळण्याचेच काम दीर्घकाळ केले. त्यांना केवळ स्वत:ची स्वच्छ प्रतिमा जपायची होती. त्यात ऑगस्टा वेस्टलॅण्डच्या कराराने सरकारला पुन्हा अडचणीत आणले.
गेल्या तीस वर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींच्या संदर्भात विचार करता संरक्षण दलांना त्यांचे अद्ययावतीकरण न झाल्याचा खूप मोठा फटका बसला. त्यामुळे नव्याने सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारसमोर असलेल्या मोठय़ा आव्हानांमध्ये संरक्षण खरेदी व्यवहाराचेही मोठे आव्हान होते. मोदी सरकारसमोर एकच एक मोठे आव्हान नाही, तर अनेक आव्हानांची अशी गुंतागुंतीची एक साखळीच समोर आहे. त्यांच्या उपाययोजनेची योग्य सांगड घालतच ती सोडवावी लागणार आहेत. यात संरक्षण आणि उद्योग यांची सांगड यशस्वीरीत्या घालण्याचा प्रयत्न हे सरकार करेल, असे संकेत मोदी सरकारने त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या वेळेस दिले होते. संरक्षणाचे क्षेत्र खासगी उद्योगांना त्यांनी खुले केले. हे खूप मोठे व महत्त्वाचे पाऊल होते. देशाच्या संरक्षणसिद्धतेबरोबरच इथले उद्योगक्षेत्रही विस्तारणे आणि देशाने स्वयंसिद्ध होणे महत्त्वाचे होते.
या पाश्र्वभूमीवर शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घेतलेल्या निर्णयांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. संरक्षणसामग्रीच्या खरेदीमध्ये गेल्या ३० वर्षांत झालेली कोंडी फोडण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. तत्पूर्वी मोदी सरकार सत्तेत आले त्या वेळेस अरुण जेटली यांनी सुरुवातीचे काही महिने अर्थ आणि संरक्षण मंत्रालयाचा कारभार सांभाळला. सुरुवातीस ते मुंबईभेटीवर आले त्या वेळेस त्यांची मंदावलेली चाल, वाढलेले वय आणि शब्दांची कमी झालेली धार जाणवली होती. व्यक्तीच्या देहबोलीतूनच तो देशाचा संरक्षणमंत्री आहे, याचा संदेश जावा, असे सामरिकशास्त्रामध्ये म्हटले जाते. जेटलींच्या देहबोलीतून ते देशात पंतप्रधानांच्या नंतर सर्वाधिक महत्त्व असलेले मंत्री आहेत, हे कळत होते; पण ती देहबोली संरक्षणमंत्र्यांची निश्चितच नव्हती.
मात्र अलीकडेच पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला, त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती पर्रिकर यांना संरक्षण खात्याचा पदभार मिळणार याची आणि झालेही तसेच. प्रथमच तरुण तडफदार व्यक्तीला संरक्षणमंत्रिपद मिळाल्याचा आनंदही सर्वत्र व्यक्त झाला. एक महत्त्वाची नोंद यानिमित्ताने घ्यायला हवी ती म्हणजे संरक्षणसामग्रीचा बदलत्या वेगवान तंत्रज्ञानाशी अतिघनिष्ठ असा संबंध आहे. त्यामुळे तंत्रज्ञान कळणारी आणि समजणारी व्यक्ती त्या क्षेत्राला अधिक न्याय देऊ शकते; पण आपल्या मनात असते तशी आदर्श व्यवस्था क्वचितच समाजात प्रत्यक्षात येते. अन्यथा देशाचा अर्थमंत्री अर्थतज्ज्ञ असावा, शिक्षणमंत्री शिक्षणतज्ज्ञ असावा, असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात होते भलतेच; पण हे असे प्रत्यक्षात घडते तेव्हा देशाला त्याचा किती फायदा होतो, याचा प्रत्यय मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले, त्या वेळेस आपल्याला आला होता. आता कदाचित दुसरा अनुभव संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कार्यकाळात येईल, अशी अपेक्षा देशवासीयांना आहे. पूर्वीच्या काळचे राजकारण आणि आताचे यात एक महत्त्वाचा भेद आहे. आताच्या पिढीला शिकलेला आणि त्या विषयात समज असणारा राजकारणी आवडतो. सुरुवातीच्या काळात अरिवद केजरीवाल यांना मिळालेल्या तुफान लोकप्रियता आणि पाठिंब्यामागेही हेच गणित होते. आताचे संरक्षणमंत्री आयआयटीअन असल्याचा अभिमान आहे, असे सांगून पंतप्रधान मोदींचे या निवडीबद्दल अभिनंदन करणाऱ्यांमध्ये तरुणाई आघाडीवर आहे.
पर्रिकरांनी संरक्षण मंत्रालयाचा कारभार घेतल्यानंतरचा पहिला मोठा निर्णय हा खूपच आशादायी आहे. बोफोर्सने कारगिलमध्ये सर्वोत्तम काम केल्यानंतरही न फुटलेली कोंडी यशस्वीरीत्या फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. १५५ मिमी / ५३ कॅलिबरच्या ८१४ तोफांच्या खरेदीचा निर्णय संरक्षणसामग्रीच्या खरेदीची जबाबदारी असलेल्या डिफेन्स अ‍ॅक्विझिशन कौन्सिलने घेतला. पाकिस्तानला सातत्याने होणाऱ्या चीनच्या अद्ययावत संरक्षणसामग्रीच्या पुरवठय़ाच्या पाश्र्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व आहे. केवळ त्यामुळे संरक्षणदलांना बळ प्राप्त होईल, एवढाच याचा अर्थ नाही, तर भारतीय कंपन्यांसोबत करार करून विदेशी कंपन्यांना निविदा भराव्या लागणार आहेत. यातील १०० तोफा या थेट आयात होणार असल्या तरी उर्वरित तोफांची निर्मिती 'मेक इन इंडिया'अंतर्गत भारतातच होणार आहे, हीदेखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. केवळ हाच निर्णय नव्हे, तर भारतीय हवाई दलासाठी १०६ ट्रेनर जेट विमानांच्या खरेदीचा निर्णयही झाला असून संरक्षण दलांसाठी लागणाऱ्या मालवाहू विमानांच्या खरेदीसंदर्भातील निर्णयालाही हिरवा कंदील मिळाला आहे. या निर्णयाने वादळवाऱ्यात हेलकावे खाणाऱ्या संरक्षण दलांच्या नौकेच्या शिडात हवा भरण्याचे काम तर केलेच, शिवाय पर्रिकरांसारख्या जाणकार नेतृत्वाच्या हाती शिडाची दोरीही असल्याने भविष्यात नौका भरकटणार नाही, अशी अपेक्षा आहे.
भारतीय संरक्षण दलांमधील जवानांचे बळी नैसर्गिक आणि शत्रूच्या घातपाती कारवायांमध्ये जातात. त्यातही अनेक बळी हे खरे तर सरकारी बेपर्वाईचेच असतात. मनोबल उंचावलेल्या जवानाच्या हाती त्याचे सामथ्र्य वाढविणारे शस्त्रही असावे लागते, नाही तर अवसानघात होतो. पर्रिकरांसारखी व्यक्ती त्या पदी आल्यामुळे आता हे केंद्राच्या बेपर्वाईचे बळी तर थांबतीलच, पण त्याच वेळेस देशाचे संरक्षणमंत्री त्यांच्या देहबोली आणि कृती दोन्हींमधून जाणवतील, हीच अपेक्षा!

- मतितार्थ (लोकप्रभा)
दि. ०५/१२/२०१४, शुक्रवार

Monday, January 19, 2015

हनुमानाची महाभारतातील भूमिका

आपल्याला माहित आहेच की महाभारताच्या युद्धात भगवान हनुमान अर्जुनाच्या रथावर विराजित होते. परंतु आपल्यापैकी केवळ थोड्याच लोकांना त्यामागची कथा माहित असावी. ती कथा अशी...
_______________________________________________________________________

धनुर्धारी अर्जुन एकदा यात्रेसाठी संतमंडळींबरोबर दौरा करत होता. विविध पवित्र जागा फिरून झाल्यावर दक्षिण भारतातील रामेश्वरम या ठिकाणी ते सर्व जण आले. रामायणाच्या काळात भगवान रामांनी, त्यांची पत्नी सीता हिला सोडवण्यासाठी लंकेला जाण्याआधी प्रभू शंकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी, एक शिवलिंग तेथे प्रस्थापित केले होते. वानरे आणि अस्वलांच्या सैन्याच्या मदतीने त्यांनी दगड व झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने त्या अथांग सागरावर एक पूल देखील बांधला होता. त्या पुलाच्या अवशेषांकडे बघून अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याने विचार केला, ‘रामासारख्या धनुर्धारी योद्धयाला एक पूल बांधण्यासाठी वानरे आणि अस्वलांसारख्या प्राण्यांवर का अवलंबून राहावे लागले? त्याने हा पूल बाणांनी का नाही बांधला?’ बरोबर असणाऱ्या एकाही यात्रेकरूला याचे उत्तर ठाऊक नव्हते. हे बघून तेथूनच दूरवर थांबलेले आणि या सर्व लोकांबरोबर फिरत आलेले एक माकड हसले आणि त्याने या प्रश्नाचे उत्तर दिले,

“बाणांचा पूल! हे राजा, तुला त्या काळातल्या पराक्रमी माकडांची काही कल्पना आहे का? सुग्रीव, नळ, नील, अंगद आणि हनुमान यासारख्या दिग्गजांनी आपापली पदे भूषविली होती. कुठल्याही बाणांचा पूल त्यांचा भार पेलू शकला नसता. त्यांचंच काय पण माझ्यासारख्या एका लहान आणि कमकुवत माकडाचा भारही बाणांचा पूल पेलू शकला नसता.”

अर्जुन ते कथित आव्हान घेण्यासाठी लगेच पुढे सरसावला.

"आपण एक पैज लावू. मी एक बाणांचा पूल तयार करतो. जर त्या पुलाला तुझा भार पेलता आला नाही तर मी स्वतःला अग्नीस अर्पण करेन."

माकड तयार झाले. अर्जुनाने आपल्या अजरामर भात्यातून बाण काढत त्या अथांग समुद्रावर एक बाणांचा पूल बांधला. माकडाने पुलावर उडी मारली आणि ते दहा पाऊलेही पुढे गेले नसेल की तो पूल कोसळला. अर्जुनाने माकडाला पाण्यातून बाहेर येण्यास मदत केली आणि पुन्हा एकदा प्रयत्न करण्याबद्दल विचारले. माकड पुन्हा तयार झाले. अर्जुनाने पुन्हा एकदा एक बाणांचा पूल बांधला, ह्यावेळी बाणांच्या मधले अंतर त्याने कमी ठेवले, व माकडाला पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची विनंती केली. माकड पुन्हा एकदा लंकेच्या दिशेने त्या पुलावरून जाऊ लागले आणि पुन्हा एकदा तो पूल कोसळला. अर्जुनाला स्वतःचीच लाज वाटली. पैजेच्या नियमाप्रमाणे, जास्त वेळ न दवडता, त्याने एक लाकडाची चिता रचली व तो आगीत उडी मारणार इतक्यात एका युवकाने त्याला मागे ओढत थांबवले.

 युवक आश्चर्याने म्हणाला, “हे शक्तिमान राजा, तू हे काय करायला निघाला होतास?”

“मला एक आव्हान देण्यात आले होते जे मी पेलू शकलो नाही. अशी लाजिरवाणी हार पत्करून मी आता जगू इच्छित नाही”, अर्जुन म्हणाला.
तो युवक विस्मित झाला. “पण पैजेचा निवाडा किंवा फैसला करणारा कोणी होता का तिथे? आव्हान देणारा बरोबर आहे किंवा नाही हे ठरवायला कोणी होते? निवाडा करायला कोणीही नसताना घेतली गेलेली स्पर्धा ही निरर्थक आहे. तेंव्हा प्रार्थना कर, पुन्हा एकदा एक पूल बांध आणि ह्या वेळी मी परीक्षक म्हणून थांबतो.”

अर्जुन काय किंवा ते माकड काय कोणीच ही गोष्ट नाकारू शकत नव्हतं त्यामुळे दोघेही तिसऱ्यादा तयार झाले. पूर्ण आत्मविश्वासाने आणि कल्पकतेने अर्जुनाने तिसरा पूल बांधला.

“घे, आता हा पूल पार करून बघ”, तो त्या माकडाला म्हणाला.

ते माकड हसत तयार झाले. ते पुलावरून चालू लागले परंतु पूल अजूनही मजबूत होता. ‘त्याने यावेळी बाण जास्त चांगले गुंफले असतील’, माकडाने स्वतःशीच विचार केला. ते पुलावर उड्या मारू लागले परंतु पूल न कोसळता तसाच मजबूत उभा राहिला. माकड आश्चर्यचकित झाले. ‘पूर्वी हा समुद्र पार करताना जे रूप मी घेतले होते ते घेऊन बघतो’, त्याने विचार केला आणि ते अचानक एका महाकाय पर्वता एवढे मोठे झाले. आपल्याला आव्हान देणारे हे माकड दुसरे कोणी नसून खुद्द महान भगवान हनुमान आहेत हे बघून अर्जुनाची दातखिळ बसली. आता केंव्हाही ह्या महान वानराच्या ताकदीपुढे हा पूल कोसळून पडेल हे उमजून भीतीपोटी त्याने मान खाली घातली. बाणांचा पूल हनुमानासारख्या महायोद्ध्यांना पेलू शकेल ह्या त्याच्या विचारातला मूर्खपणा त्याला कळून चुकला. तो खूपच शरमला. पण.. तो पूल कोसळला नाही. महाकाय हनुमानाच्या वाजनानेदेखील! अर्जुन बावरला! काय चालू आहे हे त्याला कळेना. अजूनही तो पूल कोसळला नाही यासाठी त्याच्याकडे कुठलेही स्पष्टीकरण नव्हते. हनुमानालाही काही कळेना! तो आता त्या पुलावर पुन्हा पुन्हा उड्या मारू लागला पण ते ही व्यर्थ होते. हा संपूर्ण वेळ त्या युवकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. एका निर्णायक क्षणी, दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना कळून चुकले की त्यांचे परीक्षण करणारा कोणी साधारण युवक नव्हता. अर्जुन आणि हनुमान दोघेही त्या युवकाच्या पाया पडले. 

 “मी राम आहे आणि मीच कृष्ण देखील आहे. अर्जुना, मी तुझा पूल कोसळण्यापासून वाचवला. तुझ्यासाठी हा एक नम्रतेचा धडा व्हावा. गर्व आणि अहंकार बड्याबड्यांना संकटात टाकतात. प्रिय हनुमान, तुला तरी हे माहित असायला हवे. अर्जुन, हा या काळातल्या योद्ध्यांपैकी एक श्रेष्ठ योद्धा आहे. तू त्याला आत्महत्या करण्यास कसं प्रवृत्त केलंस?”

अर्जुन आणि हनुमान यांनी प्रभूंची क्षमा मागितली आणि प्रभूंनी त्यांना आशीर्वाद दिला.


"प्रायश्चित्त म्हणून, भावी काळात होणाऱ्या महायुद्धात मी तुझ्या रथाला स्थिर करेन आणि त्याचे संरक्षण करेन" हनुमान म्हणाला.

“तथास्तु! भावी काळात होणाऱ्या घनघोर महायुद्धात अर्जुन ज्या रथावर आरूढ होईल त्या रथाच्या झेंड्यावर तू विराजमान असशील”, असे हनुमानाला म्हणून प्रभू अंतर्धान पावले.                   


Thursday, January 15, 2015

'शार्ली एब्दो' च्या निमित्ताने… - राजेंद्र येवलेकर

फ्रान्समध्ये शार्ली एब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकावर बुधवारी जो हल्ला झाला त्यामुळे सगळे जगच सुन्न झाले. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा तर तो हल्ला होताच, पण एका कलेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होता. एक व्यंगचित्र हजारो शब्दांत जी टिप्पणी करता येणार नाही ती एका छोटय़ाशा चित्रातून करते. आता हा हल्ला फ्रान्समध्ये झाला आहे हे विशेष. कारण ज्या फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन लोकशाही मूल्यांची देणगी जगाला दिली, तिथे वृत्तपत्रस्वातंत्र्यावर झालेला हल्ला सहजगत्या खपवून घेतला जाणार नाही हे उघड आहे. तेथील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कायदाही प्रत्येकाला
त्याचे विचार मांडण्याचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य देणारा आहे. त्यामुळे 'शार्ली एब्दो'ला अनेक धमक्या मिळूनही त्याचे संपादक मंडळ मुस्लीम अतिरेक्यांच्या धमकावण्यांपुढे मान तुकवणे अशक्य होते. 'शार्ली एब्दो'वर झालेल्या हल्ल्यानंतर या घटनेच्या विविध विश्लेषणांचे विच्छेदन..

'शार्ली एब्दो'ची धाडसगाथा!
समाजातील व्यंगावर बोट ठेवणारे डाव्या वळणाचे हे फ्रेंच साप्ताहिक १९६९ मध्ये सुरू झाले. कॅथॉलिक, इस्लामिक, ज्यू, उजव्या विचारसरणीचे गट त्यांच्या टीकाटिप्पणीच्या फटकाऱ्यातून सुटले नाहीत. हे साप्ताहिक १९६० साली जॉर्ज बेर्नियर व फ्रँकाईस कॅव्हान यांनी हाराकिरी या नावाने सुरू केले होते. एका वाचकाने त्याचे वर्णन तेव्हाच 'डम्ब अॅण्ड नॅस्टी' असे केले व नंतर तेच त्याचे ध्येयवाक्य बनले. १९६१ मध्ये आक्षेपार्ह स्वरूपाबद्दल त्याच्यावर बंदीही घालण्यात आली. नंतर १९६६ मध्येही त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. १९६९ मध्ये ते 'हाराकिरी एब्दो' नावाने साप्ताहिक रूपात सामोरे आले. १९७० मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष चार्लस द गॉल हे एका नाइट क्लबमध्ये मरण पावले त्या वेळी त्या घटनेत एकूण १४६ जण मरण पावले असतानाही 'ट्रॅजिक बॉल अॅट कोलोंबे, वन डेड' असे शीर्षक देऊन 'एब्दो'ने खळबळ उडवून दिली होती. नंतर पुन्हा त्याच्यावर बंदी घातली होती. आताच्या स्वरूपातील शार्ली एब्दोचे प्रकाशन जुलै १९९२ मध्ये सुरू झाले. त्याचा पहिला अंकच १ लाख इतका खपला होता. एकदा तर त्यांनी पॅलेस्टिनी असंस्कृत आहेत असा लेख लिहिला होता. तो सहकारी पत्रकार जोना शोलेट यांनाही आवडला नाही, त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले. नंतर फिलीप व्हाल हे या प्रकाशनाचे संचालक बनले. ज्यांना व्यंगचित्रातील टिप्पणी कळत नाही तेच खरे वांशिकतावादी आहेत, असे व्हाल म्हणतात. प्रथमदर्शनी पाहता त्यांची व्यंगचित्रे आक्षेपार्ह वाटतीलही, पण त्यातील आशय बघता त्यांची टीका धर्मावर नव्हे, तर त्यातील दांभिकता व मूलतत्त्ववादीपणावर आहे. 

हल्ल्यांची मालिका
२०११ :  शार्ली एब्दोने एक व्यंगचित्र काढले होते. त्यात मुहम्मद पैगंबर हे अतिथी संपादक दाखवले होते व हसून मेला नाहीत तर १०० फटक्यांची शिक्षा मिळेल, असे वाक्य त्यांच्या तोंडी टाकले होते. त्यामुळे भडकलेल्या मूलतत्त्ववादी मुस्लिमांनी भल्या पहाटे या साप्ताहिकाचे कार्यालयच उडवून दिले होते. त्या वेळीही शार्ब यांनी असे म्हटले होते की, ज्यांना इस्लाम काय आहे तेच माहीत नाही त्यांनी हा हल्ला केला.
२०१२ : सप्टेंबर २०१२ मध्ये पुन्हा शार्लीने मुहम्मद पैगंबरांवर व्यंगचित्रे प्रकाशित केली. त्यातील काही नग्न स्वरूपातीलही होती. त्या वेळी फ्रान्स सरकारने या साप्ताहिकाची सुरक्षा वाढवली होती. आता यावर त्यांच्या संपादक मंडळाचे मत असे होते की, दर आठवडय़ाला (बुधवारी) आम्ही व्यंगचित्रे काढतो त्यात सर्वाची खिल्ली उडवलेली असते. केवळ मुहम्मद पैगंबरांची व्यंगचित्रे काढली जातात तेव्हाच प्रक्षोभक स्थिती निर्माण होते, या प्रश्नाला समाजाकडे काय उत्तर आहे. मुस्लीम समाज असहिष्णू आहे हेच यातून त्यांना सांगायचे आहे. ज्यांना विनोद पचवता येत नाही तो समाज अनारोग्याकडे वाटचाल करीत असतो. ज्यांना टीकेला वैचारिक पातळीवर उत्तर देता येत नाही तो समाज उत्क्रांत होत नाही, तशीच काहीशी स्थिती या साप्ताहिकाने उघड केली. ते केवळ पैगंबरांवरच नाहीतर अनेक राजकीय नेत्यांचीही खिल्ली उडवत असत. 

व्यंगचित्रे एक हत्यार
शार्ली एब्दोने २००६ मध्ये डेन्मार्कच्या व्यंगचित्रकाराने काढलेली मुहम्मद पैगंबरांची व्यंगचित्रे प्रसिद्ध केली होती. अनेक फ्रेंच राजकारण्यांनी विनंती करूनही या साप्ताहिकाने कुणाची भीड बाळगली नाही, पण फ्रान्समधील एकूण खुले वातावरण बघता त्यावर बंदी घालणे अयोग्यच आहे. त्याला अल्ला हो अकबरच्या आरोळय़ा देत नृशंसपणे पत्रकार, व्यंगचित्रकारांना ठार करणे हे उत्तर नव्हते. सध्या तरी विजय या अतिरेक्यांचा झाला. त्यांनी लेखणीला एके-४७ रायफलने उत्तर दिले आहे. या हल्लेखोरांना नंतर ठार करण्यात आले ही बाब वेगळी, पण त्यांनी फ्रान्ससारख्या प्रगत देशाला तीन दिवस झुंजवत ठेवून तेथील लोकशाही मूल्यांना सामाजिक सलोख्याला मोठा तडाखा दिला. या घटनेनंतर काही मशिदींवर हल्ला झाला. क्रियेस प्रतिक्रियेने उत्तरातून काही साध्य होत नाही असा अनुभव आहे, कारण मशिदी पेटवल्याने ज्यांनी हे सगळे घडवून आणले त्या अल काईदाचे उद्दिष्ट काही अंशाने साध्य झाले.

प्रतिक्रियांचे मोहोळ
इस्लाम हॅज ब्लडी बॉर्डर्स. मारेकऱ्यांनी या व्यंगचित्रकारांना ठार करताना अल्ला हो अकबरच्या घोषणा दिल्या, पण त्याचा धर्माशी संबंध नाही असे म्हणण्याचा मूर्खपणा कुणी करील असे वाटत नाही.
 -रिचर्ड डॉकिन्स, 'द गॉड डेल्यूजन' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक

सर्वच धर्म हिंसेशी सारखेच निगडित नाहीत. काहींनी हिंसेचा मार्ग काही शतकांपूर्वीच सोडून दिला आहे. फक्त एका धर्माने तो सोडलेला नाही. पॅरिसमधील हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देश कदाचित हिंसाचार व इस्लामचा संबंध जोडणे थांबवतील असे हल्ल्यामागील सूत्रधारांना वाटले असावे.
-अयान हिरसी अली, 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या लेखिका
 
इस्लाममध्ये असे काहीतरी असले पाहिजे, जे त्यांना हिंसाचार, दहशतवाद व स्त्रियांची मुस्कटदाबी करण्यासाठी प्रवृत्त करीत असावे.
-निकोलस ख्रिस्तॉफ, 'टाइम्स'चे लेखक
 
पाश्चिमात्य मुस्लिमांनी स्वत:मधील न्यूनगंड काढून टाकावा व आपण पाश्चिमात्य लोकांइतकेच या समाजाचे जबाबदार घटक आहोत असे मानले पाहिजे. त्याच्या जोडीला त्यांना अधिकारही मिळतील. हल्ला करताना मुहम्मद पैगंबरांच्या निंदेचा सूड घेतला असे हल्लेखोर ओरडले खरे, पण प्रत्यक्ष तसे नाही. आमचा धर्म, आमची मूल्ये व इस्लामिक तत्त्वे यांच्याशी तो हल्ला म्हणजे विश्वासघात होता. त्या भयानक घटनेचा आपण निषेधच करतो.
-तारिक रमादान, प्राध्यापक, इस्लामिक स्टडीज, ऑक्सफर्ड विद्यापीठ.

युरोपमधील इस्लाम
फ्रान्समध्ये ३५ लाख मुसलमान आहेत, पण ते सर्व सुशिक्षित आहेत. हल्लेखोरही सुशिक्षित आहेत. ते उत्तम फ्रेंच बोलत होते. मग त्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धर्म व मूलतत्त्ववाद यातील फरक समजत नसेल असे म्हणता येणार नाही. फ्रान्समधील साधारण ११००-१२०० मुस्लीम हे सीरिया व इतरत्र इसिससाठी लढत आहेत. तुलनेने ही संख्या नगण्य आहे. त्यांना खरे तर इसिसने जिहादची हाक दिली आहे, पण लगेच काही ते छाती पिटत लढायला जात नाहीत. त्यांचे खरे तर फ्रान्समध्ये चांगले चालले आहे. ते उत्तर आफ्रिकेतील स्थलांतरित असले तरी त्यांचा तिथे जम बसला आहे, त्यामुळे दहशतवादी कारवायांच्या मार्गाला जाणे शक्य नाही. पण सुरुवातीला मुस्लिमांचा वापर अमेरिका, फ्रान्स यांनी करून घेतला व आता इसिस व अल काईदासारख्या संघटना करून घेत आहेत. हा हल्ला वरवर पाहता व्यंगचित्रांवरचा, पत्रकारितेवरचा असला तरी त्यातील अतिरेकी संघटनांची व्यूहरचना वेगळी होती व ती यशस्वीही झाली. व्यूहरचना अशी होती की, फ्रान्समधील सुशिक्षित मुस्लिमांना हाताशी धरून असे हल्ले करायचे, त्यामुळे फ्रेंच जनतेत इस्लामविषयी भय निर्माण होईल. मग ते फ्रेंच मुस्लिमांवर हल्ले करतील व मग त्यांच्या या अन्यायाविरोधात त्यांना कुणी वाली राहणार नाही, मग ते इसिस व अल काईदाची वाट धरतील. काही अंशाने झालेही तसेच, फ्रेंच इस्लामी धर्मगुरूंनी या हल्ल्याचा निषेध केला असतानाही तेथील मशिदींवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्याचे आणखी एक कारण सांगितले जाते, ते म्हणजे फ्रान्स हा अमेरिकेचा मित्र आहे व सीरियातील अतिरेकीविरोधी कारवाईत त्यांचा सहभाग आहे, त्याचा राग दहशतवादी संघटनांना आहे. 

धर्मनिंदा पण किती वेळा
 एक अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मुस्लिमांच्या खोडय़ा इतक्या नियमितपणे काढल्या जाव्यात का व अमेरिका व युरोपने असे सहन केले असते का, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली एखादी गोष्ट किती वेळा खपवून घेतली जावी, असाही एक प्रश्न आहे. याचा अर्थ अतिरेक्यांनी केलेले कृत्य समर्थनीय आहे हे सांगण्याचा नाही. ईश्वरनिंदा करणारी ही व्यंगचित्रे हजारो वेळा काढून छापली जात असतील तर वंचित समाजाला ती दुखावणारी असतात, असे व्हॉक्सचे मॅट येगवेसिस यांनी म्हटले आहे. सुडाने सुडाचाच जन्म होतो, तसे यातून घडू शकते याचे भान ठेवायला हवे. त्यांच्या मते हा वांशिकवाद नाकारला पाहिजे. वंचित समाजाविषयी अभिव्यक्तिस्वातंत्र्य असले तरी इतक्या प्रमाणात कुचेष्टा करणे फारसे समर्थनीय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. जरी फ्रान्समध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे तरी अजूनही तिथे मुस्लिमांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे राजकारण्यांनाही रोखता आलेले नाही. त्यामुळे अशा गोष्टीतून विचार परिवर्तन होते का, हा खरा प्रश्न आहे, असे जॅकब कॅनफील्ड यांनी म्हटले आहे.

- विशेष (लोकसत्ता)
दि. १५/०१/२०१५, गुरुवार

Wednesday, January 14, 2015

पानिपत : मराठ्यांचे राष्ट्रीयत्व, शौर्याचे प्रतीक - अनिल यादव

    
     जगात अशी काही युद्धे लढल्या गेली, ज्यामुळे त्या-त्या देशातील सामाजिक, भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीत मोठी उलथापालथ झाली. दिल्लीपासून ९० किलोमीटरवर असलेल्या पानिपतावर झालेल्या तीन युद्धांनी भारताचा सर्व इतिहासच बदलून टाकला. पहिल्या महायुद्धाने हिंदुस्थानात मुघल राजवटीचा उदय झाला. 
      दुसऱ्या युद्धात अकबराने हेमू या हिंदू राजाची हत्या करून बादशाही बळकट केली, तर तिसऱ्या आणि विध्वंसक ठरलेल्या तिसऱ्या युद्धाने महाराष्ट्रधर्माला, मराठाशाहीला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. पाश्‍चिमात्य इतिहासकारांनी पानिपतावरील मराठ्यांच्या राष्ट्रीयत्वाला, पराक्रमाला मुजरा केला. विचारवंत आणि इतिहासकार इव्हॅन्स बेल लिहितात की, मराठे हे ‘हिंदी लोकांसाठी हिंदुस्थान’ या ध्येयाने आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेने लढले. त्यामुळे पानिपतची लढाई मराठ्यांना अभिमानास्पद आणि कीर्ती मिळवून देणारी घटना आहे. प्राचार्य रॉलिन्सन मराठ्यांचा पराक्रम आणि क्षात्रतेजाने भारून गेले. ते लिहितात, इतिहासातील एखादा पराजय हा विजयाइतकाच सन्मान देणारा ठरतो. मराठ्यांच्या सर्व इतिहासात त्यांच्या फौजेने राष्ट्रातील सर्व उत्तम शिलेदारांसह पानिपतच्या घनघोर रणक्षेत्रात आपल्या देशाच्या आणि धर्माच्या वैऱ्यांशी लढताना जे मरण पत्करले, त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्‍वचितच नोंदले गेले असेल.
     परदेशी इतिहासकार पानिपतावरील मराठा पराक्रमाचे गोडवे गात असताना दुर्दैवाने काही भारतीय लेखक आणि इतिहासकार पानिपत हे मराठे आणि महाराष्ट्रावरील कलंक आणि अपयश असल्याचे मानतात. वास्तविक पाहता दिल्लीत मुसलमानी राजवट असताना शेकडो मैल दूर असलेल्या पुण्यावरून मराठा लष्कराला पानिपतावर जाण्याची मुळीच गरज नव्हती. खरे तर दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मुघलांची हुजरेगिरी, गुलामगिरी करणारे, त्यांच्या बाजूने लढणारे तत्कालीन राजपूत, जाट, मुस्लिम संस्थानिक, राजेरजवाड्यांची होती. दिल्लीच्या इभ्रतीचे रक्षण करण्यासाठी आलेल्या मराठ्यांना मदत न करता बिळात लपून बसणाऱ्या वर उल्लेखित सर्वांसाठी पानिपत हे कलंक आहे. या भूमीचे अन्न खाल्लेला, तिच्यावर पोसला गेलेला रोहिलखंडचा नजीब खान, अवधचा  नबाब शुजाउद्दोला यांनी मराठ्यांच्या राष्ट्रधर्माची बाजू न घेता आपल्या धर्माची तळी उचलून धरत देशाशी बेइमानी केली. त्यामुळे पानिपतचा कलंक हा मराठ्यांवर नव्हे, तर या सर्व बेइमानांवर आहे. पानिपतावर मराठे प्राणाची आहुती देत असताना महाराष्ट्र वगळता उर्वरित हिंदुस्थानातील तथाकथित ‘पराक्रमी’ राजे-महाराजे, संस्थानिक गंमत पाहत होते. धर्माने मुसलमान असलेल्या दिल्लीच्या बादशहाचे राज्य शाबूत ठेवण्यासाठी लाखभर मराठ्यांनी मैदानावर जिवाची जी होळी खेळली, त्याला देशाच्या इतिहासात तोड नाही. 
      अफगाणिस्तानचा शासक अहमदशहा अब्दाली, भारतातील बेइमान नजीबखान रोहिला आणि अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी हे युद्ध धर्मासाठी लढले. परंतु, मराठ्यांनी देशासाठी युद्ध केले. कारण, मराठ्यांचे लष्कर हे अठरापगड जातींचे होते. त्यात मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, हबशी यांच्यासह महाराष्ट्रातील बारा बलुतेदार शिपाई सहभागी झाले होते. भगवा झेंड्याच्या रक्षणासाठी मुस्लिम असलेल्या इब्राहिम खान गारद्याने धर्मासाठी नव्हे, तर राष्ट्रकार्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. सदाशिवराव भाऊने तर पानिपतावर अभिमन्यूप्रमाणे लढताना अतुलनीय पराक्रम गाजविला. त्यांच्या शौर्याला तोड नाही. अनेक सरदार त्यांना रणांगण सोडण्याचे सल्ले देत असताना भाऊने देशकार्यासाठी मरण पत्करणे पसंत केले. शहाण्णवकुळी मराठ्यातील असे एकही घराणे नव्हते की, ज्याने पानिपतावर तलवार गाजविली नाही. शिंदे घराण्याच्या अख्ख्या एका पिढीनेच पानिपतावर हौतात्म्य पत्करले. या युद्धाचे  नेतृत्व अनुभवी दत्ताजी शिंदे अथवा मल्हारराव होळकर यांच्याकडे असते तर युद्धाचा निर्णय वेगळा लागला असता. अर्थात, राजकारण आणि धर्मकारण करताना मराठ्यांनी धर्मभेद केल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे पानिपतचे युद्ध मराठ्यांवरील कलंक असल्याचे संबोधणे हे इतिहास घडविणाऱ्या मराठ्यांवर अन्याय केल्यासारखे होईल. 
     हिंदुस्थानच्या इतिहासातून शिवराय, महाराष्ट्र आणि मराठे वगळल्यास केवळ पराजयच आणि पराजयच दिसतो. म्हणूनच अठरापगड जातींच्या समूहातून तयार झालेला मराठा आणि मराठाधर्माने सतरावे आणि अठरावे शतक आपल्या पराक्रमाने गाजविले. पानिपतच्या युद्धानंतर मराठे संपले नाहीत, तर यापुढे त्यांनी दिल्लीचा कारभार आपल्या हातात घेतला. म्हणूनच इंग्रजांनी दिल्लीची सत्ता मुघल, राजपूत, शीख, जाट या शासकांशी लढून नव्हे, तर मराठ्यांशी लढून घेतली.

- सकाळ
दि. १४/०१/२०१५, बुधवार
पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा रोमांचक व धावता आढावा घेण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा. 

Monday, January 12, 2015

पॅरिसचा गर्द काळोख

Albert Uderzo's tribute shows Asterix declare: I too am Charlie




स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची ज्या पॅरिसमध्ये नवतुतारी फुंकली गेली आणि ज्या पॅरिसमधील विविध कलांच्या उन्मुक्त नवसर्जनाकडे साऱ्या जगाने अनेक शतके कौतुकाने आणि अचंब्याने पाहिले; त्या पॅरिसमध्ये जणू काळरात्र वस्तीला आली आहे. जगाच्या इतिहासात दहा पत्रकारांना एकाचवेळी गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रकार कधी घडला नव्हता. त्यातही, व्यंगचित्रकारांना लक्ष्य करून निषेधाच्या घोषणा देणाऱ्या दहशतवाद्यांनी आपले क्रौर्य कोणती परिसीमा गाठू शकते, हे दाखवून दिले आहे. हा इशारा केवळ फ्रेंच पत्रकारांसाठी नाही. तो साऱ्या जगातील पत्रकार, चित्रकार, कलावंत आणि विचारवंतांना आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या पंढरीत पत्रकारांचे रक्त सांडून या दहशतवाद्यांनी 'तुमच्या हातातल्या लेखणीवर आणि कुंचल्यावर इतकेच प्रेम असेल तर दुसऱ्या तळहातावर मनोमन शीर उतरवून ठेवा' असा इशाराच दिला आहे. 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिकाच्या नावातला 'चार्ली' हा शब्द चार्ली या कार्टुनपात्राशी नाते सांगणारा आहे. तो चार्लस द गॉलचाही अप्रत्यक्ष उपहास करणारा आहे. ४५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या, मध्येच काही काळ बंद पडलेल्या या साप्ताहिकाचा खप ४५-५० हजारांच्या आसपास असेल. हा आकडा तसा फार नाही. पण विरोधातला किंवा वेगळा आवाज ​कितीही छोटा अथवा दुर्लक्षणीय असला तरी तो ठेचून काढायचा, हीच सगळ्या रंगांच्या दहशतवाद्यांची रीत असते. तिने यावेळी टोक गाठले. 'चार्ली हेब्दो' हे डाव्या​ किंवा काहीवेळा अतिडाव्या विचारांचा आसरा घेत असे. त्याच्या व्यंगचित्रांच्या, लेखांच्या माऱ्यातून जगातला एकही धर्म, विरोधी तत्त्वज्ञान किंवा 'आयडॉल' सुटले नाहीत. 
 इस्लामी दहशतवाद आणि चार्ली हेब्दो यांच्यातील ही लढाई गेली आठ-नऊ वर्षे चालू होती. २००६ मध्ये रडणाऱ्या आणि 'या मूर्खांच्या तावडीत कुणीकडून सापडलो' असा शोक करणाऱ्या प्रेषिताचे चित्र छापून चार्ली हेब्दोने या लढाईला तोंड फोडले होते. ती लढाई पुढे कोर्टांमध्ये गेली. तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक यांनी 'कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जातील, इतके स्वातंत्र्य घ्यायला नको,' अशी भूमिका घेऊन सबुरीचा सल्ला दिला. मात्र, नंतर सार्कोझी हे अध्यक्ष मात्र फ्रान्सला उपहासाची आणि विडंबनाची दीर्घ परंपरा आहे, असे सांगत चार्ली हेब्दोच्या पाठीशी ठाम उभे राहिले. सार्वजनिक ठिकाणी बुरखा कशाला? असेही सार्कोझी यांनीच ​विचारले होते. चार्ली हेब्दोने न्यायालयीन लढाया केल्या, पण माघार घेतली नाही. स्वतःचे उच्चारस्वातंत्र्य गहाण ठेवण्याचेही नाकारले. तात्त्विक चर्चेत प्रोव्होकेशन म्हणजे खंडनपर उत्तेजनेला (साध्या भाषेत 'उचकावण्याला') महत्त्व असते. अशा प्रोव्होकेशनमुळे संभाव्य सत्याची सापेक्षता कमी होऊ शकते. संवादाचे नवे मार्ग दिसू शकतात. पण विडंबनपर कार्टुन्समधून जन्म घेऊ शकणाऱ्या अशा कोणत्याही चर्चेत या कडव्या दहशतवाद्यांना रस असणे शक्यच नव्हते. या अर्थाने ही कमालीची विषम लढाई होती. इस्लामी दहशतवादाशी चाललेल्या सुसंस्कृत जगाच्या लढाईने आशिया, आफ्रिका हे खंड पादाक्रांत केलेच होते. पश्चिम युरोप खदखदत असला तरी तेथे या लढाईने इतके उग्र रूप आजवर घेतले नव्हते. या हल्ल्यामुळे फ्रान्स आणि युरोप यांच्या वर्तमानाला गंभीर वळण लागू शकते. तंत्रज्ञानाने अपार ताकद कमावलेला जगभरातला मीडिया या आव्हानाकडे कसा पाहतो आणि कोणती रणनीती आखतो, हे लवकरच स्पष्ट होईल. पॅरिसचे निर्भर आकाश काळवंडून टाकणारा हा गर्द काळोख अनेक रंगांत आपल्या आकाशावर चाल करून येऊ शकतो. तो शिकस्त करून रोखायला हवा. 

-  अग्रलेख (संपादकीय, महाराष्ट्र टाईम्स)
दि. ०९/०१/२०१५, शुक्रवार

केंव्हा तरी पहाटे

केंव्हा तरी पहाटे

केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली
सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचेउसवून श्वास माझा, फसवून रात गेली
कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशीकळले मला न केव्हा, निसटून रात गेली
उरले उरात काही, आवाज चांदण्यांचेआकाश तारकांचे, उचलून रात गेली
स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्तीमग ओळ शेवटाची, सुचवून रात गेली



  गीतकार  - सुरेश भट
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक - पद्मजा फेनानी
कलाकार - अर्चना जोगळेकर
चित्रपट - निवडुंग

जीवनात ही घडी

जीवनात ही घडी

जीवनात ही घडी अशीच राहू दे
रंगविले मी मनात चित्र देखणे

हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
पाहू दे असेच तुला नित्य हासता

प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे

लज्जेचा त्याविणका अर्थ वेगळा
स्पशार्तून अंग अंग धूंद होऊ दे

जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे


चित्रपट- कामा पुरता मामा
गीतकार - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - लता मंगेशकर

एकवार पंखावरुनी

एकवार पंखावरुनी
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो कधी उन्हामध्ये न्हालो,कधी चांदण्यात
वने,माळराने,राई,ठायी,ठायी केले स्नेहीतुझ्याविना नव्हते कोणी,आत अंतरात
 
फुलारून पंखे कोणी, तुझ्यापुढे नाचे रानी
तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत

मुका बावरा, मी भोळा पडेन का तुझिया डोळा?
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात

संगीत - वसंत पवार 
स्वर - सुधीर फडके 
चित्रपट - वरदक्षिणा
गीत - ग. दि. माडगूळकर
कलाकार : रमेश देव

तुझे गीत गाण्यासाठी

तुझे गीत गाण्यासाठी 

तिन्ही लोक आनंदाने भरून गाउ दे रे 
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे 

शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे 

मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी 
सोहळ्यास सौंदर्याच्या तुला पाहू दे रे 

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेउनी येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे

गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - यशवंत देव
स्वर - सुधीर फडके

मला सांगा सुख म्हणजे

मला सांगा सुख म्हणजे

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं!

दान घेतानाही झोळी हवी रिकामी
भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली
आपण फक्‍त घेताना लाजायचं नसतं

देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो
हवंय ? नको ! ते म्हणणं प्रश्नच नसतो
आपण फक्‍त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं

गीत - श्रीरंग गोडबोले 
संगीत - अशोक पत्की 
स्वर - प्रशांत दामले 
नाटक  -  एका लग्नाची गोष्ट

Thursday, January 8, 2015

शाईचा इतिहास - सुचेता भिडे

सही ही आपली ओळख असते. सही करण्यासाठी पेन आणि शाईसुद्धा पाहिजे. शाई म्हणजे लिहिण्यासाठी वापरण्यात येणारा पाण्यापेक्षा घट्ट द्रवपदार्थ असं म्हणता येईल. शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर शाई हे एक कलिल द्रावण आहे. कलिल द्रावण म्हणजे, उदा. शाईचे काही थेंब पाण्यात टाकले तर पाण्याला शाईचा रंग येतो. पाण्यात शाईचे कण दिसत नाहीत. म्हणजे शाई पाण्यात विरघळली आहे असं आपल्याला वाटतं. याच पाण्यातून जर प्रकाशाचा किरण टाकला तर प्रकाशाचे किरण सगळीकडे पांगलेले दिसतात. शाईमध्ये असलेल्या पण पाण्यात न विरघळणाऱ्या आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म कणांमुळे प्रकाशाचे किरण पांगलेले दिसतात. अशा प्रकारचा जो द्रवपदार्थ असतो त्याला 'कलिल द्रावण' असं म्हणतात.
२५०० वर्षांपूर्वी माणसाला लिहिता-वाचता येत नव्हतं. अशा वेळेस स्वत:चं मनोरंजन करण्यासाठी मानवानं दगडामध्ये कोरीव काम करायला सुरुवात केली. हे काम आकर्षक दिसावं म्हणून त्यात कोळशाची बारीक पूड भरायला सुरुवात केली. अशा प्रकारे कोळशाच्या पुडीचा उपयोग रंग तयार करण्यासाठी होऊ शकतो असं लक्षात आलं. इजिप्तमधील लोकांनी कोळशाच्या पुडीत डिंक मिसळून काळा रंग तयार केला. या रंगाचा वापर कागदावर लिहिण्यासाठी केला. डिंक वापरल्यामुळं ही शाई खूपच घट्ट झाली. कागदावर शोषली जाणारी, प्रवाही शाई करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. ओक झाडाच्या फांद्यांवर गाठी असतात. या गाठींची भुकटी वापरून शाई तयार केली. या शाईला लोकांची पसंती मिळाली. हा साधारण अकराव्या शतकानंतरचा काळ असेल. त्या काळात मुद्रणाचा शोध लागला नव्हता. चौदाव्या शतकात मुद्रणाचा शोध लागला आणि मुद्रित शाई कागदावर उमटली.
मुद्रणाची शाई, लिखाणाची शाई असे शाईचे प्रकार विकसित झाले. लिखाणाची म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर लाल शाई, निळी शाई, काळी शाई असे वेगवेगळे प्रकार येतात. कारण आपल्याला फक्त शाईच्या रंगातील फरक दिसतो. त्या शाईचं अंतरंग दिसत नाही.
शाईचे अंतरंग
शाईत असलेल्या घटकांनुसार शाईचे काही प्रकार आहेत. उदा. कार्बन शाई. काजळी हा कार्बनशाईतील महत्त्वाचा घटक. धातूचं पातेलं विस्तवावर ठेवलं की खालून काजळी धरते. हा अनुभव आपण नेहमीच घेतो. काजळी हा एक कार्बनयुक्त पदार्थ आहे. काजळी आणि डिंक हे पदार्थ शाई तयार करताना पूर्वीपासून वापरले जात होते. काजळीमधील कार्बनचे अत्यंत बारीक कण सूर्यप्रकाशामुळं फिकट होत नाहीत. कार्बन शाईनं लिहिलेल्या कागदावर जर आपण ब्लिचिंग पावडर टाकली तरीही शाईचा रंग जात नाही, हे या शाईचे वैशिष्टय़. ओलसर दमट हवेचा या शाईवर परिणाम होतो. 
आयर्न-गॉल या शाईत ओक झाडाच्या खोडावरील गाठीची पूड असते. या गाठी म्हणजे गॉल. याशिवाय फेरस सल्फेट हा महत्त्वाचा रासायनिक पदार्थ वापरतात. लोखंडाला इंग्रजीत आर्यन म्हणतात. लोखंडाचे लॅटीन भाषेतील नाव फेरस. या दोन महत्त्वाच्या पदार्थामुळेच या शाईला आयर्न-गॉल शाई असं नावं दिलं आहे. गाठींमध्ये टॅनिक आम्ल असते. टॅनिक आम्लाची फेरस सल्फेटबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन फेरस टॅनेट आणि सल्फ्युरिक आम्ल तयार होतं. फेरस टॅनेट पाण्यात विरघळतं. हे कण पाण्यात विरघळतात आणि कागदावर शोषले जातात, फेरस टॅनेटचे कण हवेच्या संपर्कात आले की हवेतील ऑक्सिजनशी त्याची अभिक्रिया होते. या अभिक्रियेत फेरस टॅनेटचं फेरिक टॅनेटमध्ये रूपांतर होतं. त्यामुळं शाईचा रंग प्रमाणापेक्षा जास्त गडद होतो. ही समस्या दूर करण्यासाठी थोडय़ा प्रमाणात ऑक्सिडीकरण कमी होईल असे पदार्थ मिसळतात. या अभिक्रियेत तयार झालेल्या सल्फ्युरिक आम्लामुळं शाईमधील आम्लाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पेनची निब खराब होते. आम्लाचं प्रमाण कमी करण्यासाठी शाईत कधी कधी अंडय़ाच्या कवचाची बारीक पूड घालतात. अंडय़ाच्या कवचात कॅल्शिअम काबरेनेट हे आम्लारी किंवा अल्कधर्मी रसायन असतं, त्यामुळं शाईतील आम्लाचं प्रमाण कमी होतं.
अ‍ॅनिलीन या प्रकारची शाई प्लॅस्टिकवर छपाई करण्यासाठी वापरतात. शिवाय मिथिल अल्कोहॉल, रेझिन, लाख हेही पदार्थ वापरलेले असतात.
शाईचे प्रकार
छपाई फक्त कागदावर होत नाही तर प्लॅस्टिकचे डबे, रंग ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बादल्या यावर कंपनीची नावं छापलेली असतात. या शाईमध्ये विशिष्ट प्रकारची रंजकद्रव्ये, मेण आणि रेझिन यांचाही वापर केलेला असतो.सर्वप्रथम रंजकद्रव्यांनी कागदावर छपाई करतात. ज्या डब्यावर किंवा बादलीवर छपाई करायची असेल त्याच्या पृष्ठभागावर छपाई केलेला कागद ठेवून विशिष्ट दाब आणि उष्णता देतात. त्यामुळे अपेक्षित असलेली अक्षरं डब्यावर किंवा बादलीवर उमटतात. या शाईला 'औष्णिक संक्रमण शाई' म्हणतात.
कागदाचा पृष्ठभाग असो किंवा प्लॅस्टिक असो, शाई वाळणं महत्त्वाचं असतं. बाष्पीभवनानं शाई वाळते तेव्हा हवेतील ऑक्सिजनचा परिणाम होतो आणि ऑक्सिडीकरणाची क्रिया होते. शाई वाळण्याची क्रिया लवकर होण्यासाठी या शाईत वनस्पती तेल आणि रेझिन यांच्या मिश्रणातून तयार केलेला ओलिओरेझीन हा पदार्थ वापरतात. या प्रकारच्या शाईला 'डिकॅल्कोलेनिया शाई' असे म्हणतात.
स्टॅम्प पॅडसाठी शाई वापरताना अशी शाई वापरणे अपेक्षित असते की जी शाई स्टॅम्प पॅडच्या पृष्ठभागावर ओलीच राहिली पाहिजे. पण कागदावर छापली गेली की वाळली पाहिजे. या शाईत इंडय़ुलीन ब्लॅक या प्रकारातील रंजकद्रव्य वापरलेली असतात.
संगणकाच्या प्रिंटरमध्ये दंडगोलाकर आकाराचा एक भाग असतो. या दंडगोलावर कोरडी किंवा द्रवरूपातील शाई पसरवलेली असते. प्लॅस्टिकची अत्यंत बारीक पूड करून त्यात रेझिन मिसळलेलं असतं. ही शाई कोरडी असते. द्रवरूपातील शाई तयार करताना आयसोपॅराफेनिक हायड्रोकार्बनचा वापर केलेला असतो.
एखादा संदेश फक्त विशिष्ट व्यक्तीलाच समजावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही अदृश्य शाई वापरू शकता. या शाईत दूध, फळांचा रस, साखरेचं द्रावण अशा पदार्थाचा उपयोग केलेला असतो. या पदार्थानी लिहिलेली अक्षरं वाळल्यावर दिसत नाहीत. मात्र त्याला उष्णता दिल्यावर तपकिरी रंगाची अक्षरं दिसू लागतात. पोटॅशियम फॅरोसायनाइड किंवा टॅनिक आम्ल या रसायनांनी लिहिलेली अक्षरं रंगहीन दिसतात. पण फेरिक क्लोराइड, फेरिक अलॅम या रासायनिक पदार्थामुळे हीच अक्षरं दिसू लागतात. 
- कुतूहल (नवनीत, लोकसत्ता)
दि. १२ - १५ सप्टेंबर, २०१४ 

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...