Saturday, September 28, 2013

चक्रीवादळ - प्रभाकर पेंढारकर

मछलीपटनम् चा सागर-परिसर.
ब्रिटीश नॅव्हिगेशन कंपनीचं कार्गोशिप 'एच. एम. एल. अलेक्झांड्रा'. दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटं.
जहाजाच्या पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमवर आवाज आला:
"धिस इज युवर कॅप्टन गिल्बर्ट रॉस…अटेन्शन ऑल स्टेशन्स. मी आतापासून जहाजाचा चार्ज घेतला आहे. वेट फॉर माय ऑर्डर्स."
        शनिवारची संध्याकाळ. सगळे जण काहीसे विसावलेले. विशाखापटनम् ला जहाज थांबलं असतं तर शहरातून फेरफटका मारावा असा मूड. पण सकाळपासून पाऊस. बहुतेक जण त्यांच्या केबिनमध्ये. कॅप्टनचा आवाज ऐकला तसे प्रत्येक जण आपापल्या स्टेशनकडे निघाले. काही क्षणांत जहाजावर धावपळ सुरु झाली. जहाज प्रवासात असताना कॅप्टनच्या डेकवर फर्स्ट ऑफिसर उभा असतो. आजही जहाजाचं संचलन तोच करत होता. पण त्याच्या लक्षात आलं, आज ह्या सागराचं लक्षण काही ठीक दिसत नाही. वादळाच्या सूचना ह्यापूर्वी आल्या होत्या; आणि नॅव्हिगेशन-अधिकाऱ्यानं त्या कॅप्टनच्या निदर्शनास आणल्या होत्या.
             हे रिपोर्ट्स जेव्हा कॅप्टननं पहिले तेव्हा त्याच्या मनात पहिला विचार आला, की अशी वादळं भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ह्या दिवसांत होतातच. त्यापासून सुरक्षित राहण्याचे दोन मार्ग : एक, ते परिसर अथवा मार्ग पूर्णपणं टाळायचा आणि दुसराच मार्ग घ्यायचा. इथं ती शक्यता नव्हती; कारण एका बाजूला थोड्याच अंतरावर आंध्रचा सागरकिनारा. दुसरा मार्ग, ह्या भागातून शक्य तो त्वरेनं पलीकडे जायचं.
       आता जहाज अशा जागी होतं, की जहाज वळवून परत मागं जायचं. पण हे कॅप्टनला स्वीकारणं पटण्याजोगं नव्हतं. मद्रासला पोहोचायची वेळ कॅप्टननंच दिली होती. तिथं कार्गो तयार होता. आणि कॅप्टन रॉस वेळेच्याबद्दल कधी तडजोड करत नसे, हे नॅव्हिगेशन-ऑफिसरला माहित होतं.
मुख्य प्रश्न होता, ह्या वादळाची तीव्रता नेमकी किती असेल?
नॅव्हिगेशन-अधिकारी म्हणाला,
"सर, आपण भारताच्या किनाऱ्यावर आहोत. युरोप किंवा अमेरिकेसारखी अत्याधुनिक रडार-सिस्टीम इथं नाही. हा त्यांनी दिलेला त्यांचा अंदाज असतो. तो बदलण्याची शक्यताही असते."
"मला वाटतं, शक्य तितक्या वेगानं आपण ह्या परिसरातून निघून जावं."
"सर, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे."
"ते मला माहित आहे. हे वादळ आपणांपर्यंत पोहोचायला नेमका किती वेळ लागेल?"
"तेही आत्ताच सांगता येणार नाही."
 कॅप्टननं नॅव्हिगेशन-अधिकाऱ्याला निरोप दिला; आणि फर्स्ट ऑफिसरला जहाजाच्या गतीबद्दल ऑर्डर दिल्या. काही वेळ त्या रिपोर्ट्सवर मन एकाग्र करून कॅप्टन रॉस विचार करत राहिले; आणि थोड्याच वेळात फर्स्ट ऑफिसरचा आवाज आला,
"मास्टर, मला वाटतं, तुम्ही वर याच."
"काय झालं?"
"समथिंग अन्युज्वल! आज समुद्र खवळल्यासारख्या लाटा येत आहेत."
"मी आलोच."
तीसएक सेकंदात कॅप्टन क्वॉर्टर डेकवर आले.
"काय झालंय?"
"मास्टर,ऑन पोर्ट साइड…"
जहाजाच्या डाव्या बाजूला क्षितिजाजवळ भली मोठी लाट झेपावत पुढं येत होती.
फर्स्ट ऑफिसर म्हणाला, "मास्टर, इट्स सुनामी!"
जपानी भाषेत सु (Tsu) म्हणजे बंदर. आणि नामी म्हणजे लाट. 'सुनामी' हा शब्द पॅसिफिक सागरातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक खलाशांच्या कानांवरून गेलेला असतो. अशा लाटा त्यांच्यापैकी काही जणांनी अनुभवलेल्या असतात;
पण त्या भर समुद्रात. तिथं त्या लाटा येतात आणि जहाजाखालून सागराच्या खोल पाण्यात निघून जातात. जर कधी त्या वर आल्या तर काही मिनिटं जहाजाला हादरे बसतात. आज पहिल्यांदाच अशी लाट फर्स्ट ऑफिसर पाहत होता. तो मनातून हादरून गेला होता. पण मास्टरसमोर त्याच्या तोंडून फक्त एकाच शब्द बाहेर आला : 'सुनामी.'
"नॉनसेन्स! सुनामी लाटा भारताच्या किनाऱ्यावर येत नाहीत. धिस इज नॉट पॅसिफिक."
"मास्टर, ही सुनामीच. वाट चुकून तर इकडं आली नसेल ना?"
"नॉनसेन्स! काय करायचं ती माझी जबाबदारी."
                कॅप्टन रॉस समुद्राच्या त्या लाटेकडे पाहत होते. तिची लांबी जणू क्षितिजाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत! उंची प्रती क्षणी वाढतच होती. किनाऱ्याजवळ जहाज तिथपर्यंत पोहोचेतो ती लाट जहाजाच्या उंचीपेक्षा किती तरी अधिक होईल. जितका किनारा जवळ तितका धोका अधिक. ह्या लाटेचा जहाजावर होणारा आघात किती टनांचा असेल? हे जहाज तो तडाखा सहन करू शकेल काय? एकाच वेळी कॅप्टन रॉसच्या मनात अनेक विचार. इतक्या वर्षांचं ट्रेनिंग. जहाजावरचा अनुभव. कामाची शिस्त आणि अशा कठीण प्रसंगी डोकं शांत ठेवून काम करण्याची अंगी मुरलेली सवय. अशा लाटेपासून जहाज जितकं दूर तितकं ते सुरक्षित. पण आता ती शक्यताच उरली नव्हती. कितीही वेगानं जायचं ठरवलं तरी ह्या लाटेपासून दूर होता येणार नाही इतकी तिची लांबी. मग तसा प्रयत्न करण्याऐवजी ही लाट ओलांडून पलीकडे गेलं तर! जहाजाची सगळ्यांत मजबूत बाजू हे जहाजाचं पुढचं टोक. धारदार आणि शक्तिशाली. आपण जर ही लाट ओलांडून पलीकडे गेलो तर आपण जिंकलो. अशा लाटा आपण पाहिल्या आहेत. त्यांना हाताळण्यात आजवरचं आपलं आयुष्य गेलं आहे. आपण ही लाट ओलांडू…रॉस ह्यांचा आत्मविश्वास जबरदस्त होता. त्यांनी जहाज वळवण्याची आज्ञा दिली. लाट जहाजावर येऊन आदळण्यापूर्वी जहाजच त्या लाटेकडे घेऊन जाण्याचा त्यांचा निर्णय ठरला. पण फर्स्ट ऑफिसरला खात्री वाटेना. त्याच्या मनात ह्या जहाजाची उंची वीसएक मीटर्स. रुंदी तेवढीच, लांबी शंभर मीटर्स. आणि ह्या लाटेची लांबी कित्येक मैलांची. तिची शक्ती ह्या जहाजाच्या इंजिनच्या कितीतरी पट. सगळ्या सागराची ताकद तिच्या पाठीशी. हे जहाज झाडाच्या एखाद्या लहानश्या पानासारखं. सगळा समुद्रच असा पुढं येतो आहे. तो ह्या जहाजाला कुठल्या कुठं फेकून देईल. शेवटी जहाज ही ह्या टीचभर मानवाची वीतभर निर्मिती. साऱ्या विश्वाची अमर्याद ताकद त्याच्या पाठीशी, म्हणून ही लाट म्हणजे हाहाकार! विध्वंस! ही लाट म्हणजे मृत्यूनं घेतलेलं पाण्याचं रूप! हा मृत्यूच! त्याचा एक लहानसा घास- हे जहाज!
                  हे जहाज आपल्याला हवं तसं वळवण्यासाठी कॅप्टन रॉस इंजिनमधल्या माणसांना सतत ऑर्डर्स देत होते. त्या शब्दाप्रमाणं इंजिनवर बारा माणसं काम करीत होती. त्यांत चार इंजिनिअर, चार मोटरमन आणि चार फिटर्स. ह्यांतले दोघे फ़िलिपाइन्स बेतावरले. इग्नेशिअस गेटा - मोटरमन आणि अलेक्स बोनाफिशिओ - फिटर. दोघं समुद्रावरच वाढले. छोट्या छोट्या एका बेटावरून दुसऱ्या बेटावर सततचा प्रवास. समुद्र त्यांचा बालपणापासूनचा सांगाती. लाटांची आणि वादळांची भीती त्यांना माहित नव्हती. पण आज काही वेगळंच घडत होतं. इंजिनजवळ उभं राहणं त्यांना कठीण होत चाललं. लाटांमुळं जहाज वर-खाली होणं हे त्यांच्या सवयीचं. पण आता जहाज असं वेडंवाकडं होत होतं, की उभा असलेला माणूस एका बाजूला पंचेचाळीस अंश वळे आणि त्यातून आपला तोल सावरण्यापूर्वी उलट्या बाजूला ढकलला जाई. सरळ उभं राहणं अशक्य झालं, त्यामुळं पोटात ढवळू लागलं. पोटातील अन्नाचा कण न् कण बाहेर फेकला जाईल असं वाटू लागलं. मोटरमन इग्नेशिअसला कळून चुकलं, की जहाजाची एक बाजू वर झाली तर इंजिनची शक्ती ती टरबाइन्सची पाती दर मिनिटाला सत्तर एक वेळा फिरवते. ती पाण्याचा त्यांच्यावरील भर नाहीसा झाला की एकदम नव्वदपेक्षा अधिक गतीनं फिरतील; आणि ह्या लाटेमुळं परत जहाज एका बाजूनं उचललं जाऊन ती पाती पाण्याखाली गेली, की त्यांची गती साठापेक्षा कमी होईल. असा इंजिनवरील दाब सतत एकदम एवढा कमी-अधिक होत राहिला तर ती काही मिनिटांत बंद पडतील, हे चीफ इंजिनियरला सांगायला हवं. पण ते सांगायची जरुरीच नव्हती. चीफ इंजिनिअर अॅम्पोन कोलासाला हे समजून चुकलं होतं. इंजिन बंद पडलं तर आपल्या हातांत हे जहाज वाचवण्यासाठी काही उरणारच नाही. कॅप्टनला वाटलं, मोटारचं स्टिअरिंग आपल्या हाती असावं; पण जर तिचं इंजिन बंद पडलं तर कितीही अनुभवी चालक असला तरी काय करणार? फरक एवढाच, मोटार आहे त्या ठिकाणी जमिनीवर उभी राहील. इथं ह्या लाटा जहाजाला त्यांच्या मर्जीप्रमाणं कुठंही फेकून देतील.
                इंजिन चालू आहे तोवर ही लाट ओलांडून जहाज पलीकडे न्यायचं. त्याकरता इंजिनवर पूर्ण ताण पडत होता. इंजिनची जागा कमालीची तापून निघाली होती. तिथं काम करणारेसर्वच घामानं निथळत होते. त्यांना सरळ उभं राहणंही जहाजाच्या वरखाली होण्यानं अशक्य झालं होतं. कॅप्टन रॉसच्या लक्षात आलं, जहाजाची इंजिन्स आणि आपले खलाशी आता हा ताण अधिक वेळ सहन करू शकणार नाहीत. खालून चीफ इंजीनियारचा आवाज आला : "मास्टर, दोन इंजिन्स बंद पडली आहेत. दुसरी केव्हा बंद पडतील  सांगता येत नाही." "डोंट टेल मी. काय वाटेल ते करा. ताबडतोब इंजिन्स सुरु होतील हे पहा."
              इंजिनियर्स, मोटारमन, फिटर्स काम करत होतेच; पण आता परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली होती. डेकवर उभ्या असलेल्या मास्टरला खाली काय घडत आहे ह्याची पूर्ण कल्पना होती. त्यांना वेगवेगळे मार्ग सुचत होते. पण आता त्यांतले कोणते अंमलात आणता येतील ह्याची खात्री वाटेना. तो ऑर्डर्स देत होता; पण नजर मात्र समोरच्या लाटेवर खिळलेली होती. ती लाट अमर्याद पाणी आणि प्रचंड शक्तीनिशी येत होती. सगळा सागरच जहाजावर आदळेल तेव्हा काय होईल? खाली इंजिन-रूममध्ये काम करणारे तिथंच बुडून मरतील काय? आणि वरच्या बाजूला असलेले नाविक कुठं फेकले जातील? निश्चितच ही लाट हा मृत्यू! हाहाकार!
             आणि तरीही रॉसची खात्री होती, की हे जहाज बुडणार नाही. ब्रिटीश-तंत्रज्ञान आणि अनुभव हे जहाज बांधण्यामागं आहे. कोणत्याही वादळाशी ते सामना करू शकेल. जहाज भरकटेल, फेकलं जाईल; पण वादळाला ते बुडवता येणार नाहीच. त्याची रचना अशी की काहीही झालं तरी ते तरंगतच राहील.
               पण हा आत्मविश्वास खाली पोर्टहोलमधून बाहेर सागर-लाटेकडे पाहणाऱ्या नाविकांना वाटेना. त्यांनी त्यांच्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण माणूस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड सागर असेल तर माणसाची शक्ती काय पुरी पडणार? आता तर सगळीच इंजिन्स बंद पडली. काहींचा हा पहिलाच अनुभव. त्यांना परत परत 'टायटानिक' ची आठवण येऊ लागली.  'टायटानिक' हिमनगाला धडकलं. इथं फक्त पाणी आहे. मग आपली बोट कशी दुभंगेल? आपण एवढे किनाऱ्याजवळ! पाण्याची खोली जेमतेम बोट तरंगत ठेवण्यापुरती! इथं ती बुडेलच कशी? आपण फार तर ह्या बोटीतून बाहेर फेकले जाऊ; पण आपण मरणार तर नक्की नाही. ही लाट बोटीवर कोसळली तर आपणाला इथं जलसमाधी मिळेल! त्यापेक्षा आपण वरच्या डेकवर जाऊ या. जे काय व्हायचं ते तिथं होऊ देत.
ते वर जायला निघणार इतक्यात मास्टर रॉसचा आवाज आला : "आणखीन तीस सेकंदात ही लाट आपल्या बोटीवर धडकेल. सावध राहा. आणि पाणी आत येणार नाही अशी सर्व दारं घट्ट बंद करून घ्या. धीर सोडू नका. आपण ह्या संकटातून निभावून जाऊ. नक्कीच. हा माझा शब्द आहे."
                 जे खालच्या बाजूला होते ते तिथंच थांबले. त्यांना नेमकं काय करावं हे समजेना. पण कॅप्टन सांगतो आहे तर आपण आपापल्या स्टेशनवरच थांबावं. तरीही काही जण वर आले होते. त्यांनी समोरासमोर ही प्रचंड लाट पहिली. ते दृश्य पाहून त्यांचा थरकाप उडाला. त्याचं मुख्य कारण, त्या लाटेचा सर्व आसमंत व्यापणारा प्रचंड आवाज. एकाच वेळी शंभर जेट विमानांनी आकाशात झेप घ्यावी असा. प्रतिक्षणी वाढणारा. जवळ जवळ येणारा. सर्व जाणिवा बधिर करणारा. ही मृत्यूलाटच!
         बरोबर तीस सेकंदांनी ती भलीमोठी लाट बोटीवर आदळली. ती बोट हादरली. एखाद्या प्रचंड धबधब्याखाली यावी तसा पाण्याचा प्रचंड लोट जहाजावर आदळला. मास्टर रॉस आणि फर्स्ट ऑफिसर रेलिंग घट्ट पकडूनही दुसऱ्या बाजूला फेकले गेले. त्यातून सावरण्यापूर्वी त्यांच्या लक्षात आलं, की भलामोठा अजस्त्र शक्तिशाली हात पाण्याखालून सगळ्या बोटीला उचलतो आहे. ह्या बोटीला ढकलत तो जमिनीकडे घेऊन चालला आहे. आणखीन काही क्षणांत त्या झाडांना, इमारतींना ओलांडून ही बोट सागरकिनाऱ्यापलीकडे जाऊ लागेल. बुद्द्धी चक्रावून टाकणारा हा आयुष्यातील पहिलाच अनुभव. त्याकडे केवळ पाहत राहण्यावाचून काही करता येणं आता आपल्या हातांत उरलेलं नाही. 

- चक्रीवादळ
लेखक - प्रभाकर पेंढारकर

Friday, September 6, 2013

ऊंचे लोग - उत्तम कांबळे

    बऱ्याच वर्षांनी कोणत्या तरी कारणानं मुंबईतल्या एका टोलेजंग हॉटेलात उतरलो होतो. अर्थात, एका संस्थेनं ते बुक केलं होतं. हॉटेलात जाताच वेटरनं तिथल्या व्यवस्थांविषयी आवश्‍यक असणारं ज्ञान भरभरून दिलं. अलीकडच्या खोल्या अत्याधुनिक सुखसोयींनी भरलेल्या आहेत. पूर्णपणे यांत्रिकीकरण झालंय. ज्याला ते समजतं, तोच खोलीचा आनंद उपभोगू शकतो. वेटरनं मेनू कार्ड समोर ठेवलं. माझ्याबरोबरचा सहकारी म्हणाला: "तुम्हाला औषध घ्यायचंय; थोडं खाऊन घ्या.''
      आम्ही दोघांनीही मेनू कार्ड चाळायला सुरवात केली. मेनूकार्ड भलं मोठं आणि हॉटेलच्या तारांकित वैभवात भर टाकणारं होतं. पदार्थ आणि त्यांच्यासमोर लिहिलेले दर वाचून गरगरायला लागलं. बाहेर २० रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली १८० रुपये, बाहेर ३०-४० रुपयांना मिळणारं ऑम्लेट इथं ५०० ते ८०० रुपये, पावाचा तुकडा १०० ते १२५ रुपये, चहा २०० रुपये... बाप रे बाप! पुढचं काही वाचवेनाच... 
        मी माझ्या सहकाऱ्याला म्हणालो: "चला, बाहेर जाऊ'' आणि त्यांची संमती न घेताच आम्ही बाहेर पडलो. माझा सहकारी समजूत काढत होता. "अहो, हॉटेलच्या भव्यतेनुसार दर ठरलेले असतात. कुणी कुरकुर करत नाही. आठवतं का, अमुक एका देशाचा अध्यक्ष इथं राहून गेलाय. अमुक मोठे उद्योगपती, संचालक, सीईओ, नट इथंच येत असतात. कुणी दराविषयी कुरकूर नाही करत...तसं करणं प्रतिष्ठेला शोभतही नाही. आपण तिथलीच सेवा घ्यायला हवी होती.''
         मी म्हणालो: "तुम्ही म्हणता ते खंरही असंल; पण यातले बहुतेक जण कुणाच्या तरी पैशावर येतात इथं. यायला हरकतही नाही; पण २० रुपयांचं पाणी २०० रुपयांना. तीच बाटली, तेवढंच पाणी; तसंच पॅकिंग...काय फरक आहे? मग पाचपट पैसे देणं म्हणजे मला थोडी उधळपट्टीच वाटते. नाहक उधळपट्टी...कुणीतरी आपलं बिल भरणार आहे, म्हणून मस्तीत केली जाणारी उधळपट्टी...'' आम्ही बाहेर गेलो. १००-२०० रुपयांत दोघांनी खाऊन घेतलं. २० रुपयांत पाण्याची बाटलीही आली. पुन्हा त्या प्रतिष्ठित हॉटेलात परतलो. सवलतीच्या दरात तिचं भाडं होतं दिवसाला १० हजार रुपये...
         आपल्या देशातली दारिद्य्ररेषा आणि तिच्या खाली असणाऱ्या माणसाचं दरडोई उत्पन्न ठरवण्यावरून मोठमोठ्या विद्वानांत आणि सरकारमध्ये वाद सुरू आहे. कुणी म्हणतं दरदिवसा ३० रुपये, कुणी म्हणतं ४० रुपये. वाद काही मिटत नाही. एकाचं दरदिवसा दरडोई उत्पन्न म्हणजे दुसऱ्याचं एक वेळचं पाणी, असंही गणित मांडता येत नाही. कल्पना करा, एखाद्यानं या प्रतिष्ठित हॉटेलात राहून दिवसभरात पाण्याच्या तीन बाटल्या फस्त केल्या, तरी करासह ६०० रुपये होतात आणि इकडं आख्ख्या कुटुंबानं ५०-६० रुपयांत जगायचं आहे. वरच्या वर्गाचं उत्पन्न वाढलं, की तोच महागाईला निमंत्रण देतो. जास्तीत जास्त महागाई म्हणजे जास्तीत जास्त प्रतिष्ठा. एकतर यातले बहुतेक जण कुणाचे ना कुणाचे तरी पैसे उडवत असतात. त्यांचा पगारही जंबो असतो. महागाईवर ना कधी ते चर्चा करतात; ना कधी तिला विरोध करतात...महागाई कितीही तीक्ष्ण दातांची असली तरी त्यांच्यापर्यंत ती पोचतच नाही. त्यांच्याकडं कवचकुंडले असतात...
         परवा 'मद्रास कॅफे' चित्रपट पाहायला गेलो होतो. बुकिंग विंडोजवळ बोर्ड लावला होता. सकाळच्या शोचं तिकीट होतं १२० रुपये, तर रात्रीच्या शोचं तिकीट होतं२२० रुपये! हा फरक का? चित्रपट तोच, जागा तीच, प्रत्येक शोवर वीज, एसी, तेवढाच खर्च होणार; मग एवढा फरक का? कुणाच्याच मनात असा प्रश्‍न निर्माण होत नाही. वरचे, मधले कुणीच याविषयी ब्र काढत नाहीत. बाहेर अतिशय उच्च दर्जाच्या लाह्या मिळतात १५-२० रुपयांना. इथं त्या १६० रुपयांना. एवढा फरक का? कुणाच्याच ओठावर असा प्रश्‍न नसतो. याउलट "आपण एन्जॉय करायला येतो; महागाईचा अभ्यास करायला नाही,' असं समर्थन बरेच जण करतात. १०-२० पटींनी अधिक रक्कम देऊन एखादी गोष्ट विकत घेण्यात एन्जॉयमेंट कशी काय असते, हा एक न सुटणारा प्रश्‍न. 
         कधीकधी मधले म्हणजे मधल्या वर्गातले लोक कुरकूर करतात; पण चित्रपट संपल्यावर. "तिकीट किती महाग आहे नाही? आणि बर्गरचे १५० रुपये लावले,' अशी त्यांची तक्रार असते. एक दिवस चित्रपटावर बहिष्कार टाकला, की सारं काही वळणावर येऊ शकतं; पण तसं कुणी करीत नाही. कॉलेजमध्ये गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या प्राध्यापकांनी अतिशय चांगलं शिकवावं आणि तो आमचा हक्क आहे, असं विद्यार्थ्यांनी थोडं जरी मोठ्या आवाजात सांगितलं, तरी ट्यूशनची दुकानं बंद पडतील; पण तसं घडत नाही. उलट, कोट्यामध्ये लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून पोरं "आयआयटी'च्या तयारीला जातात. तिथल्या "दुकानदारां"
नी प्रवेशावर निर्बंध आणले. ट्यूशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा सुरू केली. ती उत्तीर्ण व्हावी, यासाठी मग पुणे, मुंबई, नाशिकमध्ये नवी ट्यूशन सुरू झाली. तिलाही प्रचंड गर्दी. मग आता तिथं प्रवेश मिळावा म्हणून अजून कुणीतरी नवी शक्कल काढेल. खिचडी खाऊन शिकणारी पोरं ट्यूशनच्या दारात जाऊ शकत नाहीत आणि फी इतकी का वाढली, असा प्रश्‍न उच्च वर्गात जगणारा कुणी विचारत नाही.
       मला आठवतं, हातात पिशवी घेऊन रस्त्यावरच्या भाजीबाजारात एकदा उभा राहिलो होतो. माझ्या अगोदरच भाजीविक्रेत्यासमोर एका महिलेनं इम्पोर्टेड गाडी लावली. गाडीची काच खाली करून आणि गाडीत बसूनच ती भाजी खरेदी करू लागली. मोठी मजेशीर रीत होती तिची. "वोह बैंगण एक किलो दो... फ्लॉवर, कोबी प्रत्येकी एक किलो' अशी ऑर्डर ती देत होती. विक्रेत्यानं साऱ्या गोष्टी पॅक केल्या. खिडकीशेजारी तो उभा राहिला. पुढच्या सीटवर थैली ठेवत तो म्हणाला: ""मॅडम, ७०० रुपये!'' मॅडमनं पटकन ७०० रुपये दिले. १०० रुपयांची टीपही दिली. बंदुकीची गोळी सुटावी, तशी तिची गाडी सुटली. मी भाजीसाठी थांबलो. "वांग्याचा दर काय?' "कोबी कसा?' असे प्रश्‍न विचारू लागलो. विक्रेत्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. 

तो म्हणाला: "मॅडमकडून जो दर घेतला, तोच तुमच्याकडून घेईन. एक पैसा जादा घेणार नाही.''
मी म्हणालो: "वांग्याचा दर काय लावला?''
तो म्हणाला: "फार नाही; १०० रुपये.''
मी म्हणालो: "वांगी तर ७० - ८० च्या भावानं विकली जात आहेत.''
तो म्हणाला: "होय, माहितीय मला; पण मॅडमनं आत्ताच नवा दर फोडला. 
१०० रुपये किलो. बघा परवडतं का?''

      कुणाच्याही लक्षात यायला हरकत नाही, की आता जगाचे सरळसोट दोन तुकडेच झाले आहेत. वरचा तुकडा बिनधास्त जगतोय. महागाई कशाला म्हणतात ते तो गुगलवर, ऑक्‍सफर्ड डिक्‍शनरीत पाहतोय. खालचा तुकडा घालमेल होऊन महागाई पचवण्याचा प्रयत्न करतोय. महागाई का वाढते, याचं कारण त्याला कळत नाही. त्याचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून सरकार महागाईला लगाम घालण्याऐवजी सबसीडीचे नवे मार्ग शोधायला लागतं. खिचडीपासून अन्नसुरक्षा विधेयकापर्यंत कोणतेही मार्ग यात असू शकतात. या मार्गावर जगण्याची व्यवस्था होईल कशीतरी; पण लढण्याची आणि विकासाची व्यवस्था होत नाही कधी...एखाद्यानं महागाईला कंटाळून आत्महत्या केली, की त्याला कसलीच भरपाई मिळत नाही आणि मिळाली तरी मरणानंतर तिचा काय उपयोग? 
       समृद्ध जीवन जगणाऱ्यांचा हेवा कुणीच करू नये. तसं करायचं काही कारणही नाही; पण समृद्ध जगणं म्हणजे नेमकं काय, हेही कधीतरी ठरवायला हवं. २० रुपयांचं पाणी २०० रुपयांना घेणं म्हणजे समृद्ध जीवन? ४० रुपयांची वांगी गाडीत बसून १०० रुपयांना घेणं म्हणजे समृद्ध जीवन? की अशा चढ्या आलेखातून पिळवणूक होतेय, असा प्रश्‍न कधीच न विचारणं म्हणजे समृद्ध जीवन?
        रस्त्यावर कुठंही संत्री, सफरचंद खरेदी करा. तुम्ही गाडीतून उतरलात तर महागाई भडकते...तुम्ही मौन पाळून व्यवहार केलात, तर ती आणखी भडकते आणि भडकत्या वस्तूत प्रतिष्ठा आहे, असं समजून बसाल, तर ती आणखी आणखी भडकते. आपल्याला त्याच्या झळा बसणार नाहीत कदाचित; पण तुमच्या मागून जो चालत येतो आहे, महिन्याचं अंदाजपत्रक पाठ करत येतो आहे, त्याला मात्र त्या झळा बसणार आहेत, हे विसरायचं का आपण? खरं म्हणजे मागून येणाऱ्याचा दोष काहीच नाहीय. दोष एवढाच, की तो वरच्या वर्गामागं उभा आहे.
         माझा एक मित्र देवदर्शनासाठी रांगेत उभा होता. त्याच्या पुढं वरच्या वर्गातला एक भक्त उभा होता. दर्शन झाल्यानंतर त्यानं दानपेटीत हजाराची पत्ती टाकली. पुजाऱ्यानं खूष होऊन त्याला देवाचा स्पर्श झालेला नारळ दिला. आशीर्वाद दिला. माझ्या मित्रानं मात्र दर्शन झाल्यावर पाच रुपयांची पत्ती टाकली. पुजाऱ्यानं तेही बघितलं आणि तो पुटपुटायला लागला: "पुढची माणसं कशी श्रद्धा व्यक्त करतात बघावं, रीत पाळावी...''
वगैरे वगैरे... वरच्यानं दानपेटीचा भावही वधारून ठेवला होता. मित्र शरमिंदा होऊन मागं परतला. त्याला त्याच्या दारिद्य्राची लाज वाटू लागली. मी म्हणालो: "नाराज कशाला होतोस आणि वरच्या वर्गात जाऊन त्यांच्यासारखं वागण्याची खोटी स्वप्नं का बाळगतोस? तुलाही हजार रुपये टाकायचे होते का? लक्षात ठेव, देव नावाची शक्ती कुणाकडं काहीच मागत नसते. हे वरचे लोक देवासह-माणसासह सर्वांनाच अशा काही ना काही सवयी लावतात... श्रद्धेत नव्हे; तर हजाराच्या पत्तीत प्रतिष्ठा आहे, असं सांगतात...''  
       मध्यंतरी वरच्या वर्गाची व्याख्या करणारी एक जाहिरात कुठल्या तरी मसाला गुटखा तयार करणाऱ्या कंपनीनं बनवली होती. उत्पादन खायचं आणि थुंकत फिरायचं. ऊंचे लोगों की कसली तरी पसंत, असं त्या जाहिरातीचं नाव होतं. एक पुडी तोंडात टाकली, की जणू काही अमिताभ बच्चनएवढी उंची प्राप्त होणार...! मग अशा जाहिरातीत काम करण्यासाठी नट-नट्याही पुढं येऊ लागल्या. आपली आर्थिक उंची वाढवू लागल्या...
        आपण वरचं जगत असताना खालच्याचं विनाकारण नुकसान करतोय...अशा खालच्या वर्गाचं, की ज्यानं या वरच्या वर्गाला विरोध केला नाही. आपण कितीही वर गेलो, तरी आपले पाय कुणाच्या तरी खांद्यावरच असतात. आपलं वरचं स्थान तोपर्यंतच टिकून राहतं, जोपर्यंत हे खांदे हलत नाहीत, उठाव करीत नाहीत, प्रश्‍न विचारत नाही... कुणी सांगावं, कोण्या एका क्षणाला या खांद्यांतूनही फुटतील प्रश्‍न...

- सप्तरंग (सकाळ)
दि. ०१/०९/२०१३, रविवार
 

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...